शिवसेना ‘रालोआ’तून बाहेर पडणार?
मुंबई:- पाठिंबा हवा असेल तर, भाजपशी सर्व संबंध तोडण्याची अट काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने घातल्याने शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (रालोआ) बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिवसेनेचे एकमेव मंत्री अरविंद सावंत यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.सरकारस्थापना आणि ‘रालोआ’तून बाहेर पडण्याबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू होती. शिवसेना सरकार स्थापन करणार असल्याचा आत्मविश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. दरम्यान, भाजप विरोधी पक्षात बसण्यास तयार आहे, मात्र शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्याची तयारी का नाही, असा सवाल राऊत यांनी केला.
राज्यपालांनी शिवसेनेला सरकारस्थापनेचे आमंत्रण देऊन सोमवारी सायंकाळी साडेसातपर्यंत निर्णय कळविण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांशीही दूरध्वनीवरून चर्चा केली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळविण्यासाठी शिवसेनेचा औपचारिक प्रस्ताव दिला जाणार आहे. त्यासाठी संजय राऊत हे नवी दिल्लीला जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची सोमवारी भेट घेण्याचीही शक्यता आहे. भाजपशी संबंध तोडण्यासाठी शिवसेनेवर दबाव असून त्यासंदर्भात सोमवारी पावले उचलली जातील, असे सूत्रांनी स्पष्ट केले.