सलमान खान घरावर गोळीबार प्रकरणातील एका आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या
अभिनेता सलमान खानच्या घरावर १४ एप्रिल २०२३ रोजी झाला होता गोळीबार
मुंबईः अभिनेता सलमान खानच्या घरावर १४ एप्रिल २०२३ रोजी गोळीबार झाला होता. गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना शस्त्रे पुरवणाऱ्या आरोपी अनुज थापरने आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर त्याला जीटी रुग्णालयात नेण्यात आलं होतं, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं आहे.
अनुज थापन असं आत्महत्या करणाऱ्याचं नाव आहे. ३२ वर्षीय अनुजला सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोघांना शस्त्रे पुरवल्याचा आरोप आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला पोलीस मुख्यालयात लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं होतं, तिथेच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. “पहिल्या मजल्यावरील पोलीस लॉक-अपच्या बाथरूममध्ये सकाळी ११ वाजता ही घटना घडली,” असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.
एका पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील इतर दोन आरोपींना जबाब नोंदवण्यासाठी नेण्यात आलं होतं, त्यावेळी थापन इतर १० आरोपींसह कोठडीत होता. सकाळी ११ वाजताच्या सुमारास तो बाथरूममध्ये गेला आणि तिथे त्याने आत्महत्या केली. यानंतर त्याला तातडीने मुंबईच्या जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आरोपी अनुज थापन हा बिष्णोई टोळीशी संबंधीत असून त्याच्याविरोधात खंडणी, शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत.
अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना दोन पिस्तुले व जिवंत काडतुसे पुरवल्याप्रकरणी सोनू सुभाष चंदर (३७) व अनुज थापन (३२) यांना दक्षिण पंजाबमधून अटक करण्यात आली होती. त्यातील थापनने बुधवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर जीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. थापन हा ट्रकवर मदतनीस म्हणून कामाला आहे. बिष्णोई टोळीकडून दोन्ही आरोपींना दोन पिस्तुल व ४० काडतुसे पुरवण्यात आली होती. त्या पिस्तुल देण्यासाठी चंदर व थापन दोघेही १५ मार्चला पनवेलला आले होते. ते पनवेलमध्ये तीन तास थांबले होते. पिस्तुल गुप्ता व पाल यांना देण्यापूर्वी चंदर व थापन यांनी दोन गोळ्या झाडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, सलमान खानच्या मुंबईतील घरावर १४ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास दोन आरोपींनी गोळीबार केला होता. नंतर ते मुंबईतून पळून गुजरातला गेले होते, तिथून त्यांना अटक केली होती. विकास गुप्ता व सागर पाल अशी अटकेतील आरोपींची नावं होती, त्यांनी चार लाख रुपयांमध्ये गोळीबाराची सुपारी घेतली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सुरतजवळ तापी नदीतून गोळीबारासाठी वापरलेल्या बंदुका जप्त केल्या होत्या.