‘शिवशाही’ला दररोज होतोय अपघात
पुणे : प्रवाशांना अधिक आरामदायी सेवा मिळावी यासाठी एसटी महामंडळाने अडीच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या शिवशाही बस अपघातांची मालिका थांबता थांबत नाही. सोमवारी (दि. २५) कात्रज घाटाजवळ झालेल्या अपघातानंतर मागील सव्वा दोन वर्षांतील राज्यातील अपघातांचा आकडा ५५० वर गेला आहे. याचा अर्थ बसचे दररोज एक ते दोन अपघात होत असल्याने ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेशी तर तडजोड केली जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
खासगी लक्झरी बससेवेला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळाने दि. १ जून २०१७ रोजी वातानुकूलित बससेवा सुरू केली. तिकीटदरही माफक असल्याने या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसटीच्या ताफ्यात सध्या स्वत:च्या मालकीसह भाडेतत्त्वावरील १ हजार बसचा समावेश आहे. पण ही सेवा सुरू झाल्यापासून अपघातांचे सत्र कमी होताना दिसत नाही. सोमवारी (दि. २५) कात्रज घाटाजवळ शिंदेवाडी येथे शिवशाही बस दरीत कोसळून दोन प्रवाशांच्या मृत्यू झाला, तर २५ प्रवासी जखमी झाले आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिक-औरंगाबाद मार्गावर झालेल्या अपघातात काही प्रवासी जखमी झाले होते. हे अपघातांचे सत्र सुरूच राहिल्याने शिवशाहीच्या सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.