‘शास्ती’चा प्रश्न सुटल्याचे सांगत पेढे वाटणा-या आमदारांना सत्ता जाताच हा प्रश्न पुन्हा आठवला, नाना काटेंची खोचक टिका
पिंपरी चिंचवडकरांची घोर फसवणूक, शास्ती, अनधिकृत बांधकामे, पाणी प्रश्न ‘जैसे थे’
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
पिंपरी चिंचवड शहरातील शास्तीकरांचा प्रश्न सुटला म्हणून जल्लोष करुन पेढे वाटले, मग आता पुन्हा विधानसभेत शास्तीचाच प्रश्न भाजप आमदार कशाला विचारताहेत, असा सवाल विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी उपस्थितीत केला आहे. तसेच मागील पाच वर्षात सत्ता असताना दादा-भाऊ या दोन्ही भाजप आमदांनी अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, पाणी प्रश्न का? सोडविला नाही, आता सत्ता गेल्यानंतर त्यांना हे प्रश्न दिसले का? असाही प्रश्न काटे यांनी उपस्थित केला आहे.
काटे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकांत म्हटले आहे की, मागील पाच वर्षे सत्तेत असणार्या भाऊ, दादा या दोन्ही आमदारांना शहरातील पाणी प्रश्न व शास्तीकराचा प्रश्न सोडवता आला नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात 95 टक्के पाणीसाठा असताना सत्ताधारी भाजपने शहरात पाणी कपात सुरू केली. विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याने लोकांच्या मनात असंतोष आहे. हे आमदार मागील पाच वर्षात सत्तेत राहून शास्तीकराचा विषय निकालात काढता आला नाही. आता सत्ता गेल्यानंतर एका महिन्याच्या आत लोकामध्ये शासन प्रतिनाराजी व असंतोष असल्याचे साक्षात्कार कसा झाला आहे.
शहरातील अधिकृत बांधकामासह शास्तीकराचा प्रश्न मार्गी लागत नाही म्हणून 2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला. या आमदारांना मागील पाच वर्षात शहरातील शास्तीकराचा प्रश्न मार्गी लावण्यात काही अंशी यश आले असे सांगताना स्वतःचे अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. तसे त्यांनी दिलेल्या निवेदनात कबूल केले आहे. 1000 चौरस फुटापर्यंत निवासी बांधकाम असलेल्या नागरिकांना जिझिया करात सूट देण्यात आली असल्याचे सरकारने वेळोवेळी घोषित केले. त्यावेळी स्थानिक भाजपच्या आमदारांनी व पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून पेढे ही भरवले होते.
नागपूरच्या तालावर नाचणारे आमदार
त्याच बरोबर शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरले असतानाही 25 नोव्हेंबर पासूनच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला. आजही शहरात अनेक ठिकाणी दूषित व व विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. शहराला समान पाणीपुरवठा करण्यासाठी योजना मार्गी लागत नाहीत. तसेच पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन होत नसल्याने पाणीकपात करावी लागते, असे भाजपच्या दोन्ही आमदार सांगतात. मागील पाच वर्षे नागपूरच्या तालावर नाचत कारभार हाकला. सत्ता गेल्यानंतर आता पुन्हा एकदा नागपुरात जाऊन शहरातील प्रश्नासाठी लक्षवेधी मांडण्याची वेळ का आली याचा अभ्यास आमदारांनी करावा. असेही म्हटले आहे.