शाळा सुरु करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महत्त्वाचे निर्णय
शाळा सुरु करण्याबाबत उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत माहिती दिली.विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपून आणि निश्चित कार्यपद्धती ठरवून शाळा कशा व केव्हा सुरू करता येतील, याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
तसेच कोरोनाच्या संकटकाळात काही खासगी रुग्णालयांकडून हलगर्जीपणा होत असून अशा रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी. या रुग्णालयांशी समन्वय ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करावेत, असे आदेशही पवार यांनी दिले.
,टाळेबंदीमुळे विविध क्षेत्रांतील उद्योग, व्यवसाय यांचे नुकसान झाले आहे. उद्योगांना उभारी देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत. रोजगार उपलब्धतेसाठी उद्योग, व्यवसाय सुरू करून स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्यावे. यासाठी शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत रोजगार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न केले जातील. ससून रुग्णालयासाठी मनुष्यबळ तसेच तातडीच्या साधनसामग्रीच्या दृष्टीने मंत्रालयस्तरावर असलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे. राज्य शासनाचा आवश्यक निधी तातडीने देण्यात येईल. असे अऩेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले आहेत.
दरम्यान, निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा देखील या बैठकीत जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत घेण्यात आला. चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने मदत देता यावी यासाठी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. सर्व बाधितांना जास्तीत जास्त मदत देण्याचही अजित पवार यांनी आश्वासन दिलं.
१३ मे रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार देण्यात येणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.