शरद पवार उद्यापासून मराठावाडा दौऱ्यावर, नुकसानीचा घेणार आढावा
मुंबई – परतीच्या पावसात झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून मराठावाडा दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यादरम्यान ते नुकसानीचा आढावा घेणार आहेत.
तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद येथे शरद पवार १९ आणि २० ऑक्टोबर दरम्यान भेट देणार असून पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत.
अतिवृष्टीबाधितांना तातडीने मदत करण्याचे आदेश
“राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गाफील राहू नका. प्राणहानी होऊ नये यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन स्थलांतराचे काम करा,” असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला अतिवृष्टी व पूरस्थितीत सतर्क राहून काम करण्याचे निर्देश दिले. बाधितांना तातडीने मदत द्या तसेच झालेल्या नुकसानाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनास दिल्या.
राज्याच्या काही भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पुढील चार दिवसात पुन्हा पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्त तसेच या विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून पूरस्थितीचा आढावा घेतला.