विष पेरण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करु नका – नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना विष पेरण्यासाठी किंवा द्वेष पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जाऊ नये असं आवाहन केलं आहे. एका चांगल्या समाजासाठी हे अत्यंत चुकीचं असल्याचंही ते बोलले आहेत. वाराणसीमधील भाजपा कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांशी नरेंद्र मोदींनी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, प्रत्येकाने सोशल मीडियाचा वापर विष पेरण्यासाठी तसंच द्वेष पसरवण्यासाठी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मात्र सोशल मीडियाचा वापर आजूबाजूच्या चांगल्या गोष्टींसाठी नक्कीच करा हेदेखील त्यांनी सांगितलं.
सोशल मीडियावर चुकीचे मेसेज पसरवणे समाजासाठी धोकादायक असल्याचंही यावेळी नरेंद्र मोदी बोलले आहेत. ‘अनेकदा लोक सभ्यतेच्या मर्यादा ओलंडतात. काही चुकीचं ऐकतात, पाहतात आणि तेच फॉरवर्ड करतात. समाजासाठी हे किती धोकायदाक आहे याचा ते विचारच करत नाहीत. काही लोक समाजाला शोभणार नाहीत अशा शब्दांचा वापर करतात. महिलांबद्दल ते काहीही आक्षेपार्ह लिहितात’, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
यावेळी त्यांनी हा कोणत्याही राजकीय पक्ष किंवा विचारसरणीचा मुद्दा नसल्याचं सांगितलं. हा १२५ कोटी भारतीयांचा प्रश्न असून प्रत्येकाने सोशल मीडियावर आपण द्वेष पसरवणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत असं मोदींनी सांगितलं आहे.
नरेंद्र मोदींनी देशाबद्दल सकारात्मक बातम्या समोर आल्या पाहिजे यावर भर देताना समाजाला एकजूट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं म्हटलं आहे. आजकाल गल्लीत दोन कुटुंबांमध्ये झालेलं भांडणही बातमी होते अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.