विरोधकांचा पराभव अटळ!
नरेंद्र मोदी यांचे भाकीत; प्रचार शेवटच्या टप्प्यात
लोकसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना, या निवडणुकीत विरोधी पक्ष सपशेल पराभूत होतील, असे भाकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्तवले आहे. लोक परिणामकारक सरकारसाठी मतदान करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. विरोधी पक्षांची निवडणुकीत धूळधाण उडेल, जनता परिणामकारक आणि प्रामाणिक सरकारसाठी मतदान करत आहेत, असे पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशात कुशीनगर व नंतर देवरिया येथील प्रचारसभांमध्ये सांगितले. या ठिकाणी १९ मे रोजी अखेरच्या टप्प्यात मतदान होणार आहे.
राज्यातील सप-बसप आघाडीवर हल्ला चढवताना मोदी म्हणाले, की अखिलेश यादव व मायावती यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची जेवढी एकूण कारकीर्द आहे, त्याहून अधिक काळ मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, मात्र माझ्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही. मी कधीही जातीचे राजकारण करत नाही आणि तुमच्या आशीर्वादाने त्याची कधी गरज पडली नाही. आता हे लोक माझे जातीचे प्रमाणपत्र मागत असल्याने, मी अत्यंत मागास जातीत जन्माला आल्याचे मी त्यांना सांगतो. मात्र भारताला जगात आघाडीचा देश बनवण्याचे माझे स्वप्न आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
मी दीर्घकाळ गुजरातचा मुख्यमंत्री होतो आणि पंतप्रधानपद तुम्ही मला दिले; पण मी किंवा माझ्या कुटुंबाने कधीही पदाचा किंवा सत्तेचा दुरुपयोग केला नाही. सत्तेचे पद मी गरिबांची सेवा करण्यासाठी व त्यांच्या कल्याणासाठी वापरले. मात्र माझ्या जातीचे प्रमाणपत्र मागणाऱ्यांनी ते सत्तेत असताना स्वत:साठी संपत्ती व मालमत्ता गोळा केली, असेही मोदी यांनी सांगितले.