#CoronaVirus नंतर’आफ्रिकन स्वाईन फ्लू’चं संकट, १४ हजार डुक्करांचा मृत्यू
गुवाहाटी, आसाम | देशात करोना संकट घोंघावत असतानाच आसाममध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लू चा शिरकाव झालाय. १० जिल्ह्यांत एव्हाना १४ हजारांहून अधिक डुक्करं या आजारामुळे मृत पावली आहेत. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मृत डुक्करांचं जमिनीत खोल खड्डा खणून दफन करण्याचा सल्ला देण्यात आलाय.
राज्याचे पशुपालन मंत्री अतुल बोरा यांनी याविषयी माहिती दिली. १० जिल्ह्यांत आत्तापर्यंत १४,४६५ डुक्करांचा आफ्रिकन स्वाईन फ्लूची लागण झाल्यानं मृत्यू झाला आहे. हे संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकार योग्य ती पावलं उचलत आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
आफ्रिकन स्वाईन फ्लू पहिल्यांदा फेब्रुवारी महिन्यात सर्वात पहिल्यांदा समोर आला होता. सुरुवातील दिब्रुगड, शिवसागर, जोरहाट, धेमाजी, लखीमपूर आणि विश्वनाथ या जिल्ह्यांतून संक्रमणाचा प्रकार समोर आला होता.
दरम्यान, आसामचे पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय औषध मंत्री अतुल बोरा यांनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा दौरा केला. तसंच जंगली डुक्करांना या जीवघेण्या आजारातून वाचवण्यासाठी उचलण्यात येणाऱ्या पावलांची समिक्षा केली.