‘जनता सरकारवर संतापलेली’
जनता भाजप सरकारवर संतापलेली असल्याने ती मतदानाच्या माध्यमातून तिच्या भावना व्यक्त करील. त्यामुळे भाजप लोकसभा निवडणुकीत पराभूत होईल हे स्पष्ट झाले आहे, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांनी सांगितले. ‘भाजप सरकार जात असल्याचे अतिशय स्पष्ट आहे,’ असे प्रियंका यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांना सांगितले. खऱ्या मुद्दय़ांवर बोलण्याऐवजी मोदी भलत्याच विषयांवर बोलत असतात. आता लोक या सरकारविरुद्धचा राग मतदानातून व्यक्त करतील. ही गोष्ट खासकरून उत्तर प्रदेशात पाहायला मिळेल, असा दावा प्रियंका यांनी केला.
आमच्या पक्षाने उपस्थित केलेल्या कुठल्याही मुद्दय़ावर मोदी उत्तर देत नाहीत आणि इतर बाबींवरच बोलतात, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेस खऱ्या मुद्दय़ांवर प्रचार करते आणि आमच्या पक्षाध्यक्षांनी खऱ्या मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी त्यांना दिलेल्या आव्हानालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मोदी व त्यांच्या पक्षाने २०१४ साली प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आणि २ कोटी नोकऱ्यांची निर्मिती करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता पंतप्रधान त्याबाबत बोलतही नाहीत, असे प्रियंकांनी सांगितले.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींचे मतदान
नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रविवारी दिल्लीत मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रपती भवनाच्या परिसरात असलेल्या सवरेदय विद्यालयात रामनाथ कोविंद यांनी मतदान केले. नवी दिल्ली मतदारसंघात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे मतदान आहे. त्यात अनेक सनदी अधिकारी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती, लष्करी अधिकारी यांचा येथील मतदारांमध्ये समावेश आहे.