विजय माल्ल्या कोणत्याही क्षणी भारतात येणार, प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण
मुंबई : भारतीय बँकांचं कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये पळालेला विजय माल्ल्या कोणत्याही क्षणी भारतात येईल, अशी माहिती तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिली आहे. मुंबईमध्ये विजय माल्ल्याविरोधात आधीच गुन्हा दाखल आहे, त्यामुळे त्याला मुंबईतच आणलं जाणार आहे. तपास यंत्रणांमधल्या सूत्रांनी सांगितल्यानुसार माल्ल्याचं विमान सोमवारी रात्री मुंबई विमानतळावर उतरू शकतं. सोमवारी रात्री विमान मुंबईत उतरल्यानंतर काही वेळातच माल्ल्याला सीबीआयच्या कार्यालयात ठेवलं जाईल. यानंतर त्याला कोर्टात सादर केलं जाईल.
इंग्लंडमधल्या कोर्टाने माल्ल्याच्या भारतातल्या प्रत्यार्पणावर शिक्कामोर्तब केलं होतं. नियमानुसार माल्ल्याला त्या दिवसापासून २८ दिवसांमध्ये इंग्लंडमधून भारतात आणायचं आहे, त्यामुळे २० दिवस आधीच निघून गेले आहेत. दुसरीकडे प्रत्यार्पणाची सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे माल्ल्या कधीही भारतात परतू शकतो.
सीबीआय रिमांड मागणार
विजय माल्ल्या मुंबईत पोहोचल्यानंतर वैद्यकीय टीम त्याच्या तब्येतीची तपासणी करेल. सीबीआय आणि ईडीचे काही अधिकारी विमानात माल्ल्यासोबत असतील. ज्यादिवशी माल्ल्या भारतात पोहोचेल, त्यादिवशी विमानतळावरून त्याला थेट कोर्टात नेलं जाईल. कोर्टामध्ये सीबीआय आणि ईडी विजय माल्ल्याची रिमांड मागतील.