वाऱ्याचा वेग वाढल्याने दिल्लीतील प्रदूषणात घट
दिल्ली व आजूबाजूच्या शहरातील प्रदूषणाची पातळी शनिवारी वाऱ्यांचा वेग थोडा वाढल्याने कमी झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी तेथे प्रदूषणाची पातळी खूपच अधिक म्हणजे ४८४ नोंदली गेली होती. त्यामुळे शाळा ५ नोव्हेंबपर्यंत बंद ठेवण्यात येणार असून बांधकामेही बंद ठेवण्यात आली आहेत.
दिल्लीत शुक्रवारी सार्वजनिक आरोग्याबाबत आणीबाणीची परिस्थिती जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आज शनिवारी सकाळी प्रदूषण निर्देशांक ४०७ झाला. गाझियाबाद, बृहत नोईडा या भागात शनिवारी सकाळी प्रदूषण निर्देशांक अनुक्रमे ४५९ व ४५२ इतका नोंदला गेला. शुक्रवारी हा निर्देशांक सायंकाळी ४ वाजता ४९६ होता. पीएम २.५ या सूक्ष्म कणांचे प्रमाण सकाळी १० वाजता दर घनमीटरला २६९ मायक्रोग्रॅम म्हणजे साठ ग्रॅम या सुरक्षित पातळीच्या चार पट अधिक होते. पीएम १० कणांचे प्रमाण ४३६ मायक्रोग्रॅम होते.
हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे, की वाऱ्याच्या वेगात सुधारणा झाल्याने प्रदूषणाची पातळी कमी झालेली दिसून आली. रविवार ते मंगळवार या काळात तेथे वारे ताशी २० ते २५ किलोमीटर वेगाने वाहतील. पंजाब, हरयाणा, राजस्थान, दिल्ली या ठिकाणी ७ व ८ नोव्हेंबरला तुरळक पावसाची शक्यता असून ‘महा’ वादळ व पश्चिम वातावरणीय कमी दाब यामुळे हा पाऊस होणार आहे. हा पाऊस अगदी हलका राहिला तरी त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होणार आहे, कारण प्रदूषक कण हे त्यात वाहून जातील. सध्याच्या प्रदूषणात ४६ टक्क्य़ांहून अधिक भाग हा पिकांचे अवशेष जाळण्याच्या घटनांचा आहे, असे ‘सफर’ या संस्थेने काल म्हटले होते. पर्यावरण प्रदूषण (प्रतिबंध व नियंत्रण) प्राधिकरण या संस्थेने शुक्रवारी दिल्लीत आरोग्य आणीबाणीची घोषणा केली होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, दिल्लीचे गॅस चेंबर झाल्याची टीका करताना, पंजाब व हरयाणात पिकांचे अवशेष जाळल्याने प्रदूषण वाढत असल्याचे म्हटले होते.
प्राधिकरणाने पाच नोव्हेंबपर्यंत सार्वजनिक आरोग्यावर आपत्कालीन स्थितीची घोषणा केली आहे. त्यानंतर पाच नोव्हेंबपर्यंत बांधकामांवर बंदी घालण्यात आली आहे. प्रदूषणाची पातळी वाढल्याने पाच नोव्हेंबपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचे दिल्ली सरकारने जाहीर केले आहे. पर्यावरण प्रदूषण (नियंत्रण व प्रतिबंध) प्राधिकरणाने सार्वजनिक आपत्कालीन परिस्थिती जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले, की पिकांचे अवशेष जाळण्यामुळे दिल्लीत प्रदूषणाचे प्रमाण खूपच वाढले असून सर्व शाळा ५ नोव्हेंबपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.