वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना १० लाखांची मदत
- पशुधनाच्या अर्थसाहाय्यातही वाढ
मुंबई : राज्यात यापुढे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना दहा लाख रुपये अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अशाच प्रकारच्या हल्ल्यात गाय, बैल, म्हैस, मेंढी, बकरी ठार झाल्यास त्याबद्दलही देण्यात येणाऱ्या अर्थसाहाय्यात वाढ करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाने तसा शासन आदेश काढला आहे.
वाघ, बिबटय़ा, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे यांच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्याच्या वारसांना आठ लाख रुपये मदत दिली जात होती. त्याचबरोबर गाय, म्हैस, बैल, मेंढी, बकरी, ठार झाल्यास सहा हजार ते १२ हजार रुपयांपर्यंत मदत दिली जात होती. ही रक्कम कमी आहे, त्यात वाढ करावी, अशी मागणी होती. नागपूरमध्ये सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्ती व पशुधनाच्या अर्थसाहाय्यात वाढ करण्याची घोषणा केली होती. महसूल व वन विभागाने त्यानुसार बुधवारी तसा शासन आदेश जारी केला आहे.
आता वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना दहा लाख रुपये मदत दिली जाणार आहे. मात्र त्यातील तीन लाख रुपये धनादेशाद्वारे दिले जातील आणि उर्वरित सात लाख रुपये दरमहा व्याज देणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकेत त्या वारसांच्या नावाने मुदत ठेवीच्या स्वरूपात जमा केले जातील, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. हल्ल्यात कायम अपंगत्व आल्यास ५ लाख रुपये आणि गंभीर जखमी झाल्यास १ लाख २५ हजार रुपये मदत मिळेल. किरकोळ जखमी झाल्यास वैद्यकीय उपचारासाठी २० हजार रुपये देण्यात येणार आहेत.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गाय, बैल, म्हैस ठार झाल्यास, बाजार भावाच्या ७५ टक्के किंवा ४० हजार रुपये यापैकी कमी असेल ती रक्कम मदत म्हणून दिली जाणार आहे. बकरी, मेंढी व अन्य पशुधनाच्या मृत्यूबद्दल १० हजार रुपये दिले जाणार आहेत. अशा प्रकारच्या हल्ल्यात पशुधन जखमी झाल्यास, वैद्यकीय उपचारासाठी चार ते १२ हजार रुपयांपर्यंत मदत दिली दिली जाणार आहे.