वंचित व विश्व वारकरी सेनेने केलेल्या या आंदोलनानंतर शासनाने दिले आंदोलकांना हे आश्वासन
सरकारकडून रेल्वे, मेट्रो आणि बसेस सुरू केल्या जातात मग मंदिरं का सुरू केली जात नाहीत?, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलन केले होते. वंचित व विश्व वारकरी सेनेने केलेल्या या आंदोलनानंतर शासनाने येत्या १० दिवसांत मंदिर उघडण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले आहे. मात्र मंदिर समितीला शासनाकडून काहीच आदेश नसल्याने आता ३० सप्टेंबरपर्यंत मंदिर बंद असणार आहे.
करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याने पंढरपूरचे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी ३० सप्टेंबरपर्यंतच बंदच असणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे आज जाहीर करण्यात आले आहे. राज्य सरकारनं लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे विठ्ठल मंदिर हे १७ मार्चपासून बंदच आहे. साडेपाच महिन्यांपासून भाविकांना दर्शन घेता आले नाहीये. देवाचे सर्व नित्योपचार परंपरेप्रमाणे सुरू असून विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन ऑनलाइन घेण्याची सुविधा भाविकांना उपलब्ध आहे.
दरम्यान, विश्व वारकरी सेना आणि वंचित बहुजन आघाडीकडून राज्यातील मंदिरे पुन्हा सुरु करण्यात यावी या मागणीसाठी पंढरपुर येथे आंदोलन केलं होतं. वंचितच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व मंदिर , मशीद , बौद्ध मंदिर , गुरुद्वारा हे लवकरात लवकर भाविकांसाठी सुरु करण्यात येतील. यासाठी नियमावली बनवण्यात येईल, असं अश्वासन दिलं होतं. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. त्याचबरोबर, प्रकाश आंबेडकर, विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष अरुण महाराज बुरघाटे यांच्यासह सह १५ जणांनी मंदिरात विठुरायाचे मुखदर्शनही घेतले.