रुग्णवाहिकेने पाच किमी अंतर ५ मिनिटात कापलं; तरीही मृत्यूने त्याला गाठलंच
धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ घडली. प्रकाश दत्तराम नारे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून त्याला वाचवण्यासाठी रुग्णवाहिका चालकाने शर्थीचे प्रयत्न केले. वाहतूक कोंडीतून अवघ्या ५ मिनिटांत पाच किमी अंतर कापत रुग्णवाहिका रुग्णालयात दाखल झाली. मात्र, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
प्रकाश दत्तराम नारे हा मुंबईत एका हॉटेलमध्ये नोकरी करत होता. रविवारी (दि.२०) मुंबईहून पुण्यात काही कामानिमित्त तो आला होता. चिंचवड येथील चुलत भावाचं त्याच्याशी रात्री उशिरा फोनवर बोलणं झालं होतं, घरी जेवायला ये आणि भेटून जा अस चुलत भावाने त्याला म्हटले होते. मात्र, फार घाईच काम असल्याने येत नसल्याचे प्रकाशने सांगितले. त्यानंतर सोमवारी (दि.२१) सकाळी आठच्या सुमारास त्याने पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट काढले रेल्वे पिंपरी रेल्वे स्थानकाच्याजवळ येताच त्याचा तोल गेला आणि तो धावत्या रेल्वेतून थेट खाली पडला.
दरम्यान, रणजीत हिरवे या रुग्णवाहिका चालकाला सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास अनोळखी तरुण धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्याचा फोन आला. त्यांनी तत्काळ घटनास्थळी जात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रकाशला इतर साथीदाराच्या मदतीने रुग्णवाहिकेत दाखल केले. प्रकाशला उपचाराची अत्यंत गरज होती, तो गंभीर जखमी होऊन अवघा रक्ताने माखलेला होता. प्रकाश शुद्धीवर असून तो श्वास घेत होत असल्याचे रणजित यांना जाणवले. रणजित यांनी वाहतूक कोंडीमधून पाच किलोमीटरचे अंतर अवघ्या पाच मिनिटात पार केले आणि प्रकाशला योग्य वेळेत रुग्णालयात दाखल केले. परंतू प्रकाशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रणजीत यांना यावर विश्वास बसत नव्हता.
रुग्णवाहिका चालक रणजित यांनी अनेकांचे मृतदेह रुग्णालयात पोहोच केले आहेत. परंतू, पहिल्यांदाच कोणाला तरी वाचवण्याच समाधान त्यांना मिळणार होतं. मात्र, ते होऊ शकलं नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली.