रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक
मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या वरळीतील घरातून ताब्यात घेतले असून ते अलिबागच्या दिशेने रवाना झाले आहेत. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रे, न्यायालयाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केली जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. याशिवाय अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे.
आज पहाटे पाच वाजता रायगड पोलीस मुंबई पोलिसांच्या टीमसह अर्णब गोस्वामी यांच्या वरळीतील घरी पोहोचले. यावेळी त्यांनी तब्बल दीड तास पोलिसांशी हुज्जत घातली. सुरुवातीला त्यांनी पोलिसांना घरात घुसूच दिले नाही. त्यानंतर दरवाजा उघडल्यानंतर दीड तास पोलिसांसोबत हुज्जत घातली. मात्र अटक वॉरंटनुसारच पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई केली. सात-साडेसातच्या सुमारास त्यांना ताब्यात घेण्यात आले. एखाद्याला अटक केल्यानंतर दुसऱ्या हद्दीत नेण्यापूर्वी डायरी करावी लागते. त्यानुसार ना म जोशी पोलीस स्टेशनमध्ये डायरी केल्यानंतर पोलीस त्यांना घेऊन अलिबागला रवाना झाले आहेत.
काय आहे प्रकरण?
वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अन्वय नाईक यांनी 5 मे 2018 रोजी अलिबागजवळच्या कावीर गावात रोजी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आत्महत्या करत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात केला होता. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती. अक्षता नाईक यांच्या तक्रारीनंतर अलिबागमध्ये 306 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. आता या प्रकरणी चौकशी करण्यासाठी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.