देशाची सेवा करण्याची संधी मिळते, हे अधिकारी होताना लक्षात ठेवावे – अविनाश धर्माधिकारी
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शासकीय सेवेत प्रशासकीय अधिकारी होत असताना सत्ता, पैसा, प्रतिष्ठा, सन्मान यापेक्षा समाजाची, देशाची सेवा करण्याची संधी मिळते, हे महत्वाचे आहे, असे मार्गदर्शन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.
लाडशाखीय वाणी समाज महासंघाच्या वतीने लाडशाखीय वाणी समाजाचे राष्ट्रीय महाअधिवेशन मारूंजी, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी (दि. 24) उद्घाटनपूर्व प्रथम चर्चासत्रात “समाज विकासात तरुणांचे स्थान” या विषयावर पत्रकार विजय कुवळेकर मार्गदर्शन करीत होते. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक अविनाश धर्माधिकारी, प्रा. डॉ. जगदीश चिंचोरे, बाळासाहेब पांडे, नितीन चितोडकर, बाळासाहेब पाटे, अतुल कोतकर, प्रशांत कोतकर, वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक राजेंद्र पाटे व किरण बागड यांचा समाजाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
अविनाश धर्माधिकारी म्हणाले की, समाजाने कळत नकळत अभ्यासाची उतरंड तयार केली आहे. त्यामुळे मुला-मुलींवर ठराविक क्षेत्रातच करिअर करण्यासाठी दबाव आणला जातो. त्यापेक्षा त्यांना कोणत्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे. त्यांची क्षमता, उपलब्ध संधी, त्या क्षेत्रातील त्यांचे भवितव्य, कुटुंब, समाज व देश विकासासाठी त्यांच्या करिअरचा उपयोग या गोष्टी प्राधान्याने विचारात घेऊन निर्णय घ्यावा. शासकीय सेवेत प्रशासकीय अधिकारी होत असताना सत्ता, पैसा, प्रतिष्ठा, सन्मान या पेक्षा समाजाची, देशाची सेवा करण्याची संधी मिळते, हे महत्वाचे आहे, असे धर्माधिकारी यांनी सांगितले.
सहाय्यक वाहतूक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते म्हणाल्या की, चारीबाजूंनी चांगले काम केले तर समाज आणि देश मोठा होईल. पुण्याचा चहूबाजूंनी विकास होत आहे. त्यामुळे राहण्यायोग्य शहर म्हणून पुणे शहराने प्रथम क्रमांक मिळविला आहे. परंतू येथे वाहतुकीची व पायाभूत सुविधांची गंभीर समस्या आहे, असेही सातपुते म्हणाल्या.
बांधकाम व विपणन व्यवसाय-भविष्यातील संधी या विषयावर ज्येष्ठ बांधकाम उद्योजक सतीश मगर, अमर मांजरेकर, संजीव बजाज यांची प्रकट मुलाखत अनघा वाटवे यांनी घेतली. यामध्ये ग्राहकांना चांगल्या सुविधा देताना अधिक आणि नियमित उत्पन्न कसे मिळेल याचा विचार करून प्रकल्प उभे करावेत, असे या उद्योजकांनी सांगितले.
यावेळी शामकांत शेंडे, अनिल चितोडकर, किरण पिंगळे, अभय केळे आदी उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय ऋतुजा अमृतकर यांनी केला. सुत्रसंचालन ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर आणि समीरा गुजर यांनी केले. आभार महेंद्र येवले यांनी मानले.