राष्ट्रवादीला धक्का, पक्षाच्या १३ नगरसेवकांचे राजीनामे
परभणी – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. परभणी ग्रामीणचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसच्या १३ नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. परभणी महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण १८ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी १३ नगरसेवकांनी पक्षाकडे आपले राजीनामे पाठवले आहेत.
परभणी महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्य विष्णू नवले यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला हे पद देण्याचा ठराव राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घेतला होता. मात्र बाबाजानी दुर्राणी यांनी ऐनवेळी पक्षाशी संबंध नसलेल्या अतिक इनामदार यांचा अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक चांगलेच संतापले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या १३ नगरसेवकांनी शहर जिल्हाध्यक्ष स्वराज परिहार यांच्याकडे आपले राजीनामे पाठवले आहेत.
बाबाजानी दुर्राणी हे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहेत, मात्र ते महापालिकेत ढवळाढवळ करीत आहेत. पक्षाच्या कोणत्याही नगरसेवकांना ते विचारात घेत नाहीत. त्यामुळे आम्ही पक्षात का रहायचे, असा सवालही या नगरसेवकांनी केला आहे. देशात आणि राज्यात भाजप-सेनेचे सरकार उलथून लावण्यासाठी राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेतून सरकारवर जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. मात्र परभणी महापालिकेतील पक्षाच्या नगरसेवकांनी केलेले बंड राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरणार आहे.