रामाचा वनवास संपला, आज बाळासाहेब हवे होते – राज ठाकरे
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत ऐतिहासिक अशा राम मंदिराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडत आहे. या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तसंच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आला आहे. या द्वारेच निमंत्रितांना भूमिपूजनाच्या स्थळी प्रवेश देण्यात येणार आहे. दरम्यान, भूमिपूजनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून निमंत्रितही या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली आहे.
अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन प्रसंगी अनेक राजकीय नेत्यांनी, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत रामाचा वनवास संपला आणि स्वतंत्र भारताच्या इतिहासातिल काही मोजके मंगलमय आनंदाचा क्षण असतात त्यातील हा क्षण असल्याचे प्रसिद्धपत्रात म्हटले आहे.
जवळपास ३ दशकांचा संघर्ष, शेकडो करसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांचा त्याग ज्या एका मूर्त स्वप्नासाठी होता, त्या स्वप्नपूर्तीचा क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आपल्या रामाचा वनवास संपला. उद्या राममंदिराचं अयोध्येत भूमिपूजन होणार, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे.
अयोध्येत उभं राहणारं राममंदिर हे नेहमीचं मंदिर नाही, ते प्रतीक आहे शतकानुशतकं हिंदू बांधवांच्या मनात सुरु असलेल्या त्राग्याचं, अगतिकतेचं, ते प्रतीक आहे कोट्यावधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं, सहनशीलतेचं आणि म्हणूनच ह्या क्षणाचं महत्व वेगळं आहे.
तीन दशकांचा संघर्ष साधा नव्हता, त्यात अनेक करसेवकांना आणि जनसामान्यांना जीव गमवावा लागला, आज त्या करसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गगती मिळेल. ह्यासाठी नेटाने न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या सरकारने जे प्रयत्न केले ते निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन.
अर्थात ह्या क्षणी स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आज ह्या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते, त्यांना मनापासून आनंद झाला असता. सध्या कोरोनाचं संकट आहे पण ज्या इच्छाशक्तीने कोट्यवधी भारतीयांनी राममंदिराचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं त्याच इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाच्या संकटावर मात करून भारत बलशाली होईल ह्याची मला खात्री आहे. तमाम हिंदू बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन.