राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’चा प्रभाव शून्य
मुंबई : ‘मोदी मुक्त भारत असा पवित्रा घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सभांच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढला होता. लोकसभा निवडणूकीत उभे न राहता राज यांनी ‘लाव रे तो व्हीडिओ’ म्हणत भाजप विरोधी जोरदार प्रचार केला. राजकीय क्षितीजावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा दिसता कामा नये हे ध्यानात ठेऊन मतदान करा, असे आवाहन राज यांनी त्यांच्या सभांच्या माध्यमातून केले होते. मात्र सकाळपासूनच लोकसभा निवडणुकीचे कल पाहता देशभरात मोदी लाट दिसत असून ‘अबकी बार तीनशे पार’चे चित्र दिसत आहे. त्यामुळे राज यांचा ‘लाव रे तो व्हीडिओ’चा प्रभाव शून्य ठरल्याचे दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. दरम्यान मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच भाजपा आणि मित्रपक्षांनी आघाडी घेतली. मतमोजणीला सुरुवात होऊन अडीच तास होईस्तोवर भाजपा आणि मित्रपक्षांची आघाडी ३०० हून अधिक जागांपर्यंत पोहोचली आहे. एनडीएच्या तुलनेत यूपीएच्या जागा फार कमी आहेत. त्यातही २०१४ नंतर पुन्हा एकदा काँग्रेसला तीन आकडी जागा मिळवण्यात अपयश आले आहे.
भाजप विरोधी भूमिका घेत राज यांनी घेतलेल्या सभांच्या फायदा अप्रत्यक्षरित्या काँग्रेस, राष्ट्रवादीला होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. तसेच राज यांच्या मोदी मुक्त भूमिकेचा मतांवर कितपत प्रभाव पडेल? याची चर्चा सर्वसामान्यांसह राजकीय वर्तुळातही रंगली होती. मात्र आतापर्यंतचे निवडणुकीचे आलेले कल पाहता देशात पुन्हा एकदा मोदी लाट आल्याने राज यांची भूमिका काय असणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. महाराष्ट्रात यंदा बदल होईल असं वाटत असतानाच पुन्हा एकदा राज्यात २०१४च्या लोकसभा निवडणुकीसारखा निकाल लागण्याची चिन्हे आहेत. राज्यातील अनेक मतदारसंघात शिवसेना-भाजपा उमेदवार आघाडीवर आहेत.