राज्यसभेत गदारोळ! ‘आप’चे तीन खासदार निलंबित
नवी दिल्ली – संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून शेतकरी आंदोलनाची धग आणखी वाढली आहे. आज सकाळी राज्यसभेत कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी लावून धरली. त्यावरून सभागृहात बराच गदारोळ झाला. अखेर विरोधकांच्या मागणीची दखल घेत सभापती व्यंकय्या नायडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी १५ तासांचा वेळ राखून ठेवला. मात्र ही चर्चा सुरू होण्यापूर्वी आपच्या खासदारांनी सभागृहात घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. तसेच आप खासदारांचा गोंधळ सुरू राहिल्याने सभापतींनी तीन खासदारांना एका दिवसासाठी निलंबित केले. २५५ नियमानुसार आपच्या तीन खासदारांवर ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, राज्यसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर सभापतींनी सदस्यांची कानउघाडणी केली. ‘सभागृहाचे काही सदस्य मोबाईलद्वारे सभागृहाच्या कामकाजाची शूटिंग करत असल्याचे दिसून आले आहे. हे वर्तन संसदीय शिष्टाचाराच्या विरोधात आहे’, असे म्हणत व्यंकय्या नायडू यांनी संताप व्यक्त केला.
Delhi: Proceedings of Rajya Sabha begin. #BudgetSession2021 pic.twitter.com/0fv7jULdPR
— ANI (@ANI) February 3, 2021