राज्यपालनियुक्त सदस्यांसाठीच्या निकषांमुळे महाविकासआघाडीची अडचण
मुंबई: विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त जागांवर निकषात बसत नसतानाही आतापर्यंत राजकीय सोय म्हणून अनेकांची नियुक्ती केली जायची. यावेळी मात्र तसे घडण्याची शक्यता नाही. त्यामुळे सत्ताधारी तीनही पक्षही सावध झालेत. राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार सुरू असलेल्या संघर्षात राज्यपाल विधानपरिषदेवरील नियुक्त्या निकषाच्या कसोटीवर तपासूनच करतील अशी शक्यता आहे. त्यामुळे निकषात बसणारे उमेदवार शोधण्याची धावपळ सुरू झालीय. त्यामुळेच आज काही सदस्यांची मुदत संपत असतानाही महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावेही निश्चित केलेली नाहीत.
विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त 10 सदस्यांची मुदत 6 जूनला तर 2 सदस्यांची मुदत 15 जूनला संपत आहे. या 12 जागांवर महाविकास आघाडी सरकारधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आपल्या कार्यकर्ते, पदााधिकाऱ्यांची वर्णी लावता येईल. मात्र आतापर्यंत जे घडत आलं ते आता होणार नाही याची कल्पनाही या तीन पक्षांना आहे.
आतापर्यंत राज्यपाल नियुक्त जागांसाठी सत्तेत असलेल्या पक्षाकडून पाठवण्यात आलेल्या नावांना राज्यपालांकडून तातडीने मंजूरी दिली जात होती. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसं करणार नाहीत, याची कल्पना महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना आहे. महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष पाहता या 12 जागांना मंजूरी देताना राज्यपाल प्रत्येक उमेदवाराचा बायोडेटा निकषाच्या कसोटीवर तपासणार, त्यामुळेच निकषात बसणारे उमेदवार शोधण्याची वेळ या तीनही पक्षांवर आली आहे.