राजीव गांधी हत्याकांड : मारेकऱ्यांच्या सुटकेसाठीची याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७ मारेकऱ्यांची सुटका करण्यात यावी या मागणीची तामिळनाडू सरकारची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी फेटाळली. २१ मे १९९१ रोजी राजीव गांधी यांची तामिळनाडूतील ह्युमॅनिटेरिअन ग्राऊंडवर मानवी बॉम्बच्या सहाय्याने हत्या करण्यात आली होती.
द हिंदूतील वृत्तानुसार, तामिळनाडू सरकारने गेल्या २४ वर्षांपासून राजीव गांधींच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या ७ दोषींची मुक्तता करण्याबाबत केंद्र सरकारकडे विनंती केली होती. मात्र, तामिळनाडू सरकारच्या मतांशी केंद्र सरकार सहमत नाही. तसेच अशा प्रकरणांमध्ये निर्णय देताना राष्ट्रपतींना मंत्री परिषदेचा सल्ला घेणे बंधनकारक असते. त्यामुळे राष्ट्रपतींनी याबाबतची दया याचिका फेटाळली आहे.
तामिळनाडू सरकारने नुकतेच केंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र लिहून राजीव गांधींच्या हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या ७ दोषींना मुक्त करण्यात यावे अशी मागणी केली होती. या तीन पानी पत्रात तामिळनाडूचे मुख्य सचिव के. ग्यानदेसीकन यांनी म्हटले की, दोषींची फाशीची शिक्षा रद्द करुन त्याचे रुपांतर जन्मठेपेत करण्यात आले आहे. मात्र, गेल्या २४ वर्षांपासून ते तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. हा कालावधी जन्मठेपेच्या शिक्षेपेक्षाही अधिक असल्याने आता त्यांची सुटका करण्यात यावी.