50 लाख कोटींच्या किराणा बाजारपेठेत अंबानी-बेजोस यांची गुंतवणूक पणाला
मुंबई| जगभरातील सर्व श्रीमंतांची नजर सध्या भारतीय खाद्यान्न आणि किराणा बाजारपेठेवर आहे. गेल्या आठवड्यात भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलने फ्यूचर ग्रुपचा व्यवसाय खरेदी केला, तर दुसरीकडे जिओ आणि फेसबुकचा करार होताच जगातील सर्वात श्रीमंत असलेले जेफ बेजोस यांच्या अमेझॉनने स्थानिक दुकानदार जोडण्यासाठी नवी मोहीम सुरू केली. ही कंपनी पूर्वीपासूनच स्थानिक दुकानदारांसाठी अनेक मोठ्या योजना राबवत होती. मेट्रो कॅश अँड केरीनुसार, देशात खाद्यान्न आणि किराणा मालाची बाजारपेठ सुमारे ५० लाख कोटींची (७०० अब्ज डॉलर) आहे. यामुळेच मोठे उद्योगपती याकडे आकर्षित होत आहेत.
विशेष म्हणजे अजूनही या बाजारपेठेत छोट्या दुकानदारांचेच वर्चस्व आहे. या बाजारपेठेत सध्या संघटित क्षेत्राचा वाटा केवळ १० टक्के आणि स्थानिक दुकानदारांचा वाटा ९० टक्के आहे. मार्केट रिसर्च फर्म फोरेस्टर रिसर्चनुसार, या वर्षी ऑनलाइन ग्रॉसरी बाजार गेल्या वर्षीच्या तुलनेत ७६ टक्के वाढून सुमारे ३ अब्ज डॉलरवर (२२,५०० कोटी) जाईल.
ई-कॉमर्स कंपन्यांना सल्ला देणारी कंपनी टेक्नोपॅके कन्सल्टिंगचे सीनियर व्हाइस प्रेसिडेंट अंकुर बिसेन यांच्यानुसार, सध्या विलीनीकरण अणि स्पर्धेबाबत ज्या बातम्या आहेत त्या या क्षेत्राचा छोटा भाग आहे. किराणा व्यापाऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. या आधुनिक रिटेलर्सना स्थानिक व्यापाऱ्यांचे महत्त्व पटले आहे.