राजकोट येथील जळालेल्या भुईमुगात आढळले माती, दगड
राजकोट : मागील आठवड्यात राजकोटच्या सीमावर्ती भागातील शापर-वेरावल येथील भुईमूग गोदामाला भीषण आग लागली होती. त्यात साठवलेल्या भुईमुगाचे प्रचंड नुकसान झाले होते. पण, आता किमान हमीभावानुसार भुईमूग खरेदीमध्ये गैरप्रकार झाल्याचे आरोप खरे होताना दिसत आहेत.
राजकोटच्या सीमावर्ती भागातील शापर-वेरावल येथील भुईमूग गोदामाला ५ मे रोजी लागलेल्या आगीचा राज्य सीआयडी विभागाकडून तपास सुरू आहे. यात सुमारे २८,००० पोती (३५ किलोग्राम प्रत्येकी) भुईमूग भस्मसात झाले आहे. या भुईमुगात मोठ्या प्रमाणात माती, टरफल आणि दगड-गोटे मिसळल्याचे आढळून आले आहे. ही भुईमूग खरेदी किमान आधारभूत किंमतीनुसार खरेदी करण्यात आली होती.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंडाल येथील गोदामाला लागलेली आग वेगळी होती. त्यात सुमारे ३५ कोटी रुपयांचे भुईमूग नष्ट झाले होते. पण, शापर-वेरावल येथे आगीत नष्ट न झालेल्या सुमारे १,२०० पोत्यांचे नमुने घेता येण्याजोगे आहेत.