breaking-newsताज्या घडामोडीपुणे

यंदा खडकवासला धरण साखळीतील चार धरणांमध्ये 29.10 अब्ज घन फूट पाणीसाठा; गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा जास्त

केंद्रीय जल आयोगाच्या नियमानुसार धरणे ही १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक असताना, पुणे शहरातील चार प्रमुख धरणांपैकी टेमघर आणि जिल्ह्यातील वडिवळे, पिंपळगाव जोगे, माणिकडोह ही चार धरणे अद्यापही शंभर टक्के भरू शकलेली नाहीत. खडकवासला धरण साखळीतील चार धरणांमध्ये २९.१० अब्ज घन फूट पाणीसाठा झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा जास्त आहे.

केंद्रीय जल आयोगाने धरणे ही टप्प्याटप्प्याने कशी भरण्यात यावीत, याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार धरणे ही ३१ जुलैपर्यंत ५० टक्के भरणे आवश्यक आहेत. तसेच ऑगस्ट महिन्यापर्यंत सुमारे ७७ टक्के आणि १५ सप्टेंबरपर्यंत शंभर टक्के भरणे अत्यावश्यक आहे. या निर्देशानुसार जिल्ह्यातील चार धरणे ही अद्यापही शंभर टक्के क्षमतेने भरू शकली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामध्ये पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर धरणाचा समावेश आहे. हे धरण ९८.६४ टक्के भरले असून, त्यामध्ये ३.६६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या धरणात एक जूनपासून आतापर्यंत २७९२ मिलिमीटर पाऊस पडला आहे. मात्र, तरीही हे धरण शंभर टक्के भरलेले नाही. या धरण क्षेत्रात ३२०० मिलिमीटर पाऊस पडल्यावर धरण शंभर टक्के भरेल, असा दावा जलसंपदा विभागाने केला आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि टेमघर या चार प्रमुख धरणांमध्ये २९.१० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा जास्त आहे. गेल्या वर्षी या दिवशी २९.०३ टीएमसी पाणीसाठा होता, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

जिल्ह्यातील अन्य धरणांपैकी वडिवळे हे धरण अद्याप शंभर टक्के भरलेले नाही. सध्या हे धरण सुमारे ९३.१२ टक्के भरले असून, सुमारे एक टीएमसी पाणीसाठा आहे. पिंपळगाव जोगे आणि माणिकडोह ही धरणे निम्मीही भरू शकलेली नाहीत. पिंपळगाव जोगे धरण हे सुमारे ४६.६१ टक्के आणि माणिकडोह धरण हे ४५.५१ टक्के भरले आहे. या धरणांमध्ये अनुक्रमे १.८१ टीएमसी आणि ४.६३ टीएमसी पाणीसाठा झाला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button