मोरवाडीतील म्हाडाच्या प्रकल्पाला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देऊ नका – बाबू नायर
- म्हाडा परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी
पिंपरी – पिंपरी, मोरवाडी येथील म्हाडाच्या नवीन प्रकल्पाचे काम पूर्ण झाला आहे. परंतु, म्हाडाने मोकळी जागा 15 वर्षांपासून विकसित केली नाही. ही जागा विकसित करुन त्यांनी पालिकेच्या ताब्यात दिली नाही. त्यामुळे म्हाडाच्या प्रकल्पाला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देऊ नये, अशी मागणी संत ज्ञानेश्वर सहकारी गृहरचना फेडरेशनचे अध्यक्ष व नगरसेवक बाबू नायर यांनी केली आहे. तसेच म्हाडा परिसरात गुन्हेगारी वाढली असून या गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना देखील समस्यांबाबत पत्र देण्यात आले आहे. पालकमंत्र्यांनी म्हाडाचे अधिकारी, म्हाडा फेडरेशनचे पदाधिकारी आणि पालिकेचे अधिकारी यांची संयुक्तिक बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नगरसेवक नायर यांनी म्हटले आहे की, मोरवाडी येथे म्हाडाने 20 वर्षापूर्वी सुमारे 1185 सदनिका बांधल्या आहेत. तथापि, म्हाडाने आजपर्यंत मोकळी जागा विकसित केली नाही. हा 1200 सदनिका धारकांवर अन्याय झाला आहे. नियमाप्रमाणे म्हाडाने ती मोकळी जागा विकसित करुन पालिकेच्या ताब्यात देणे आवश्यक आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे म्हाडाच्या मोरवाडीतील प्रकल्पाला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यात येऊ नये. म्हाडाकडून मोकळी जागा विकसित करुन घेतल्यानंतरच त्यांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यात यावा, अशी मागणी देखील नायर यांनी केली आहे.
तसेच मोरवाडी येथील म्हाडा प्रकल्पाने अभि हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे त्याचे पुनर्वसन होत नाही. त्यासाठी ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याची मागणी, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्याकडे करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर नगर येथे एसएनबीपी ग्रुपची शाळा आहे. त्यांना प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळेला परवानगी देण्यात आली आहे. परंतु, या ठिकाणी बेकायदेशीरपणे महाविद्यालय सुरु केले आहे. त्याला कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नाही. येथे आलेले महाविद्यालयातील विद्यार्थी गोंधळ घालतात. दंगा करतात. याचा नाहक त्रास म्हाडा कॉलनीतील नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे महाविद्यालय येथून स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी नायर यांनी एसएनबीपी ग्रुपचे अध्यक्ष डी.के. भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.