10 वी पास तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी, परीक्षेशिवाय 561 जागा भरणार
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने कोरोना संकंटादरम्यान 561 पदांची भरती जारी केली आहे. विशेष म्हणजे फक्त दहावी पास उमेदवारदेखील नोकरीसाठी अर्ज दाखल करु शकतात. याशिवाय 561 पदांसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही. त्यामुळे दहावी पास उमेदवारांना चांगला फायदा होऊ शकतो. ईस्ट कोस्ट रेल्वेने ही भरती जारी केली आहे
देशभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. मात्र, लॉकडाऊनदरम्यान स्थलांतरित मजुरांना घरी सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकार आणि रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या पाठोपाठ रेल्वे प्रशासनाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने कोरोना संकंटाच्या दरम्यान 561 पदांची भरती जारी केली आहे.
कोणकोणत्या पदांसाठी भरती?
ईस्ट कोस्ट रेल्वेने जारी केलेल्या भरतीत नर्सिंग सुपरिटेंडेंट, फार्मासिस्ट, हॉस्पिटल अटेंडेट या पदांचा समावेश आहे. यामध्ये नर्सिंग सुपरिटेंडेंट या पदासाठी 255 पद, फार्मासिस्टसाठी 51 पद आणि हॉस्पिटल अटेंडेट, ओटीए, ड्रेसर या पदांसाठी 255 पद असे एकूण 561 पदांसाठी ही भरती जारी करण्यात आली आहे.
या पदांसाठी इच्छुक उमेदवार 22 मे 2020 पर्यंत अर्ज दाखल करु शकतात. या भरतीत विविध पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रतेची अट ठेवण्यात आली आहे. यात विशेष म्हणजे 10 पास उमेदवारही अर्ज दाखल करु शकतो. उमेदवारांची निवड ही मेरिट लिस्टनुसार केली जाईल.