मोदींनी उद्योगपती अदानी आणि अंबानींना देश विकला – आमदार जिग्नेश मेवानी
पुणे |महाईन्यूज|
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्योगपती अदानी आणि अंबानी यांना देश विकून बसले आहेत आणि दिल्ली मधील शाहीन बागच्या महिला ५०० रुपयांत विकले गेल्याचे सांगतात. मोदी चारित्र्यहनन नेते बनले आहेत. आठवीच्या इतिहास पुस्तकात मोदी यांचा इतिहास नाही येणार तर शाहीन बागमधील महिला संघर्षाचा येईल, सरकारशी असहकार करा आणि एनआरसी बाबत कोणती कागदपत्रे मागण्यास आले तर देऊ नका. अशा शब्दांत गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.
एनआरसी, सीएए आणि एनपीआर याचे विराेधात पुण्यातील सारसबागेजवळील अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात महासभेचे आयाेजन करण्यात आले आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती बी.जी.काेळसे पाटील होते. या वेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, तिस्ता सेटलवाड, राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, सुषमा अंधारे, मोहन जोशी उपस्थित होते. या वेळी नागरिकांची उपस्थित होते.
आपण अनेक वर्षे दलित आणि सवर्ण, गरीब आणि श्रीमंत लढाई करत बसलो म्हणून मोदी -शाह सत्तेवर आले आहेत. जात पात धर्म सोडून भारतीय बनले पाहिजे. वीर सावरकर कोणी नव्हते तर ब्रिटिशांना माफीनामे देणारे सावरकर होते आणि आज त्यांची औलाद हिंदू आणि मुस्लिम भेद निर्माण करतात. संविधान, इन्कलाब जिंदाबाद बोला आणि आपले धर्म रीतिरिवाज घरात ठेवा, असा सल्ला मेवानी यांनी या वेळी बोलताना दिला.