मृत्यूशी झुंज संपुष्टात; ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांचे उपचारादरम्यान निधन
भारताचे माजी राष्ट्रपती, माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे संकटमोचक अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले आहे . मृत्यूच्या वेळेस ते 84 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून मुखर्जी यांची प्रकृती नाजूक होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांना १० ऑगस्ट या दिवशी लष्कराच्या रिसर्च अॅण्ड रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांची मृत्यूशी झुंज संपुष्टात आली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्यामुळे त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मंगळवारी त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यानंतर त्यांच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा दिसली नाही. प्रणव मुखर्जी यांना करोनाची लागण झाल्याचेही स्पष्ट झाले होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश येऊ शकले नाही. आज त्यांची प्राणज्योत मालवली.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना १० ऑगस्ट या दिवशी रात्री १२ वाजून ७ मिनिटांनी दिल्लीतील लष्करी छावणीत असलेल्या लष्कराच्या रिसर्च अॅण्ड रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूत रक्ताची गाठ असल्याचे डॉक्टरांना आढळले. त्यानंतर त्यांच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली.
राजकीय क्षेत्रात प्रणवदा या नावाने परिचित असलेले प्रणव मुखर्जी यांचा जन्म ११ डिसेंबर १९३५ ला बंगाल्या वीरभूम जिल्ह्यातील मिरती गावात झाला. त्यांचे वडील कामदा किंकर मुखर्जी हे स्वातंत्र्य सैनिक होते. तसेच ते बंगाल विधानसभेचे सदस्य देखील होते. प्रणवदांनी कोलकाता विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली आहे.
प्रणवदांनी आपल्या करिअरची सुरुवात पोस्ट अॅण्ड टेलिग्राफ ऑफिसमधून केली. ते क्लार्क होते. त्यानंतर ते सन १९६३ मध्ये विद्यानदर कॉलेजात राज्यशास्त्राचे प्राध्यापक बनले. त्यांनी पत्रकार म्हणूनही काही काळ काम केले . त्यानंतर सन १९६९ मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेचे सदस्य बनले आणि येथूनच त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली.