#Unlock-4: ‘या’ कारणास्तव अनलॉक-4 मध्ये लोकल, मेट्रो सेवेला परवागनी नाही!
मुंबई । प्रतिनिधी
राज्य सरकारने काल अनलॉक-4 ची नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये राज्यातील जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी आवश्यक असलेल्या ई-पासची सक्ती रद्द करण्यात आली असून, हॉटेल उघडण्यासही काही अटींसह परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र सरकारने लोकल ट्रेन, मेट्रो सुरू करण्याचा आणि मंदिरे खुली करण्याचा निर्णय टाळला आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
केंद्राने मेट्रोसेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे राज्यात देखील 7 सप्टेंबरापासून मेट्रो धावेल अशी शक्यता होती, मात्र राज्य सरकारने अद्याप हा निर्णय घेतलेला नाही. लोकल सेवा देखील सध्यातरी सुरू न करण्यावर सरकार ठाम आहे.
मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी त्याबाबत आधीच आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाकडे मागणी केली व त्यास अनुमती मिळाली तर आम्ही लगेचच लोकलसेवा पूर्ववत करू, असे नमूद करण्यात आले आहे. लोकल रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते, हाच धोका ओळखून राज्य सरकारने आजच याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.