मुलींच्या लग्नाचं वय बदलणार? मोदी सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय
नवी दिल्ली – मुलींचं लग्नाचं वय वाढवावं अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होते आहे. त्यापार्श्वभूमीवर लवकरच सरकार निर्णय जाहीर करणार असल्याचं मोठं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मुलींच्या लग्नाचं वय निश्चित करण्यासाठी एका समितीचं गठण करण्यात आलं आहे. या समितीने अहवाल दिला की लगेच यासंबंधी निर्णय घेता येईल, असं मोदी म्हणाले. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
नरेंद्र मोदींनी सांगितलं की, “मुलींच्या लग्नाचं योग्य वय किती असावं यासंबंधी चर्चा सुरु आहे. संपूर्ण देशभरातील मुलींनी मला अद्यापही संबंधित समितीने अहवाल सादर केला नसल्याबद्दल विचारणा केली आहे. मी त्या सर्वांना आश्वस्त करतो की अहवाल आल्यानंतर लगेचच सरकार त्यावर काम सुरु करेल”. लग्न आणि आई होण्याचं वय यामधील नेमका संबंध जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारकडून २२ सप्टेंबर रोजी टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे.
नरेंद्र मोदींनी यावेळी महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. “प्रत्येक मुलीच्या हिताची आपण काळजी घेत आहोत. जल जीवन मोहिमेअंतर्गत प्रत्येक घराला पाणी पोहोचवण्याचं काम सुरु आहे. १ रुपयात सॅनिटरी पॅड उपलब्ध केलं जात आहे,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.