मुख्यमंत्र्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
- मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू
- संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार यांची मागणी
पिंपरी – औरंगाबाद येथे मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीसाठी कायगाव येथील गोदावरीच्या पुलावरुन उडी मारुन मराठा समाजाच्या तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि. 23 दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. या घटनेला जबाबदार ठरल्याने मुख्यमंत्र्यांवर भादवी कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिला आहे.
काकासाहेब दत्तात्रय शिंदे (वय 28, रा. कानटगाव, ता. गंगापुर) येथील असे तरुणाचे नाव आहे. त्यांनी कायगाव टोका येथील नव्या पुलावरुन उडी मारली होती. जुन्या पुलापर्यंत गटांगळ्या खात हा तरुण वाहत गेला. तरुणाला बाहेर काढले असून त्याची प्रकृती गंभीर होती. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जीवरक्षक पथकातील दशरथ बिरुटे यांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मराठा क्रांती मोर्चातर्फे समन्वयकांनी गंगापूर तहसील कार्यालयात निवेदन दिले होते. निवेदनात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने त्या निवेदनाची कोणतीही दखल घेतली नसल्याचे समोर आले आहे.
आपत्कालिन रुग्णवाहिका सेवेतून काकासाहेब यांना उपचारासाठी कायगाव टोका येथून गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयाकडे रवाना केले. मात्र, त्याचे निधन झाले.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही
कानडगाव (ता. गंगापूर) येथील काकासाहेब दत्तात्रय शिंदे (वय 28) या तरुणाने कायगाव टोका येथून गोदावरी पात्रात जलसमाधी घेतली. आता मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याशिवाय काकासाहेब यांचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही. अशी भुमिका येथील मराठा क्रांती मोर्चातील समन्वयकांनी घेतली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील मराठा समाजात प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे. या घटनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर भादवी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार यांनी केली आहे.