मुख्यमंत्र्यांची “कुटनिती” राष्ट्रवादी महापालिकेत राबविणार
- विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा भाजपवर हल्ला
- भाजप पदाधिका-यांना राहूल कलाटे यांच्या प्रश्नांची भिती?
पिंपरी – लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न विचारण्याच्या भितीपोटी सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांनी गेल्या दोन महिन्यांपासून सर्वसाधारण सभा तहकूब करण्याचा सपाटा लावला आहे. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नसल्यामुळे सभा तहकूब करून लोकप्रतिनिधींची मुस्कटदाबी केली जात आहे. त्यामुळे विकास कामांना खीळ बसली आहे. चुकीच्या कामांबाबत बोलल्यास अडचण निर्माण होत आहे. खोटे पण रेटून असा कारभार पालिकेत सुरू असून याच्या विरोधात मुख्यमंत्र्यांची साम, दाम, दंड, निती, भेद ही कुटनिती वापरणार आहे, असा इशारा राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिला आहे.
भाजपने गेल्या सव्वा वर्षात तब्बल 18 वेळा महासभा तहकूब केली आहे. यावरुन विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सत्ताधा-यांवर हल्ला चढविला आहे. पत्रकारांशी बोलताना साने म्हणाले, “भाजपच्या राजवटीत शहरातील अनधिकृत बांधकामाची जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी सर्वसाधारण सभेत अनधिकृत बांधकामांविषयी विचारलेल्या प्रश्नांमुळे भाजपचा हा चेहरा जनतेसमोर येणार आहे. याशिवाय जागा ताब्यात नसतानादेखील शहरातील पार्कींग धोरण निश्चितीसाठी भाजपचा आटापिटा सुरु आहे. हे दोन्ही विषय भाजपच्या अंगलट येणारे आहेत. त्यामुळे वारंवार सभा तहकूब केली जात असून हा त्यावरील उपाय ठरु शकत नाही”
“कोणत्याही आदरणीय व्यक्तिचे निधन झाल्यास, त्या व्यक्तिला श्रध्दांजली वाहण्यात यावी. याबद्दल कुणाचेच दुमत नाही. मात्र, याकरिता दहा मिनिटे, अर्ध्या तासाची तहकुबी समजु शकतो. भाजप नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर त्यांना सभागृहात श्रद्धांजली अर्पण करुन, अर्ध्या तासाच्या तहकुबीनंतर सभा सुरु करणे अपेक्षित होते. मात्र, ही सभा येत्या 20 तारखेपर्यंत तहकूब केल्याने शहराचे नुकसान होत आहे. या दिवशी तहकूब आणि नियमित अशा दोन सभा होणार आहेत. या दोन्ही सभा एकाच दिवशी होतील का नाही. याबाबत मी साशंक आहे” असेही साने म्हणाले.