मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला
मुंबई- गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांसह कोल्हापूर, सांगलीत धुमाकूळ घातलेल्या पावसाने आज काहीशी उसंत घेतली होती. मात्र ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाची रिपरिप सुरूच होती.
मुंबईला दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पेडर रोड येथे भूस्खलन झाल्याने 50 झाडे कोसळली होती. ही पडलेली झाडे रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम आज पालिका प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले होते. तर दुसरीकडे कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झाला होता. कोल्हापुरात काल संध्याकाळपासून पावसाने थोडीशी उसंत घेतली होती. मात्र पावसामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आज सकाळी राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले होते. या धरणातून 7 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु होता. सांगली जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झाला असला तरी कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कोणतीही आपत्तीजनक स्थिती उदभवू नये यासाठी एनडीआरएफचे पथक जिल्ह्यात तैनात करण्यात आले होते.