मुंबईत मास्क विना फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश
राज्यातील कोरोना विषाणूचे वेगाने होणारे संक्रमण रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. देशभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत असताना महाराष्ट्रात कोरोनाची संख्याही थक्क करुन सोडणारी आहे. त्यात मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. शहरातील वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी बृहमुंबई महानकर पालिकेने आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. मास्क विना फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. जर नागरिकांनी मास्क वापरले नाही तर त्यांना अटकेच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही पालिकेने बुधवारी स्पष्ट केले.
महानगर पालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी मेडिकलमध्ये उपलब्ध असणारे मास्क किंवा घरातील साध्या कपड्याचा मास्क म्हणून वापर केला तरी देखील काहीच हरकत नाही. सध्याच्या घडीला लॉकडाऊनची परिस्थिती आहे. पण जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी जेव्हा कोणी नागरिक बाहेर पडले त्याने मास्कशिवाय बाहेर पडू नये. मास्कशिवाय फिरताना कोणी आढळले तर त्याला कारवाईला सामोरे जावे लागेल. एका परिपत्रकाच्या माध्यमातून बुधवारी पालिकेने ही माहिती दिली.
मुंबईत खासगी किंवा सरकारी कामानिमित्त दुचाकीवरुन फिरणाऱ्यांनी मास्कचा वापर करावा. सरकारी कर्मचाऱ्यांनी बैठकीवेळी मास्क घातलेला असावा, अशा सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत. जर शहरात कोणी विना मास्कच फिरताना आढळले तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. नियमाचं उल्लंघन केल्यास अटकेची कारवाईही केली जाऊ शकते, असा उल्लेख परिपत्रकामध्ये करण्यात आला आहे.