मुंबईकरांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याची मागणी भाजपाची मागणी
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक भागात घराघरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील सामानांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती जाहीर करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मुंबईकरांना प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत करा,अशी मागणी भाजपाने केलीये.
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना पत्र लिहून ही मागणी केली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईत एक प्रकारचं वादळचं आलेलं आहे. अवघ्या १२ तासात मुंबईमध्ये २९४ मिमी एवढा पाऊस झाला, याचाच अर्थ ही नैसर्गिक आपत्ती आहे. दरवर्षी प्रमाणे केवळ तुंबणारे पाणी अशी परिस्थिती नसून ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि त्यामुळे या दोन दिवसामध्ये झालेल्या अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती जाहीर करून मुंबईकरांना मदत करा, अशी मागणी आमदार भातखळकर यांनी केली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हातावर पोट असणारे लोकं तसेच चाळींमधील निम्न-मध्यम वर्गीय अशा सर्वच लोकांना रोजगारापासून वंचित राहावे लागल्यामुळे मुळातच त्यांच्याकडे कुठल्याही स्वरूपाची आर्थिक बचत आता राहिलेली नाही. अशा काळामध्ये हे अतिवृष्टीचे संकट आल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी सर्वसामान्य माणसाची स्थिती झाली आहे. करोना महामारीमध्ये राज्य सरकारने एका दमडीचीही मदत केलेली नाही. आज शिधावाटप दुकानावर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचं धान्य देखील मिळालेलं नाही अशी परिस्थिती आहे. या सर्व बाबी लक्षात घेता या नैसर्गिक आपत्ती नंतर सरकारने सर्वेक्षण करावे अशीही मागणीही भातखळकर यांनी केलीये.