मुंबईकरांच्या चिंतेत वाढ? मुंबईतील घाटकोपर परिसर ठरतोय कोरोनाचा नवा हॉटस्पॉट
मुंबईतील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यात यश आलं असलं तरी आता मुंबईतील घाटकोपर परिसर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरतोय. या ठिकाणी कोरोनामुळे 575 जणांचा बळी गेल्याची माहिती देण्यात आली आहे. महापालिकेने जाहीर केलेली आकडेवारी पाहता, एकूण 6645 जणांचा शहरात शनिवार पर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये N वॉर्ड हा टॉपवर आहे. तर K वॉर्ड म्हणजे पूर्व विले पार्ले-अंधेरी-जोगेश्वरी येथे एकूण 460 जणांचा बळी गेला आहे. तर G नॉर्थ वॉर्ड म्हणजे धारावी-दादर-माहिम येथे यापूर्वी कोरोनाची भयंकर परिस्थिती होती. परंतु आता हे परिसर तीसऱ्या क्रमांकावर असून येथे426 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
घाटकोपर येथे मृत्यूदर सर्वाधिक म्हणजेच 9 टक्के असून तो एकूणच शहराच्या दुप्पट आहे. त्याचसोबत कोरोनाच्या रुग्णांबाबत बोलायचे झाल्यास घाटकोपर हा सहाव्या क्रमांकावर असून येथे मार्च पासून 6263 रुग्ण आढळून आले आहेत. तर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, घाटकोपर मधील बळींचा आकडा सर्वाधिक आहे. त्याचसोबत यापूर्वी झालेल्या मृतांचा आकडा सुद्धा नव्या बळींच्या आकडेवारीत म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या आकडेवारीत दाखवला जाणार आहे. त्यामुळे एकूण महिन्याभारत किती जणांचा बळी गेला हे समजून येणार आहे.
दरम्यान, घाटकोपरचे आमदार पराग शाह यांनी असे म्हटले आहे की, येथे बहुतांश कोरोनाचे रुग्ण हे इमारतीत राहणारे आहेत. परंतु कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढेल म्हणून महापालिकेकडून अधिक नागरिकांची चाचणीच करण्यात येत नाही आहे. तर महापालिकेने असे म्हटले आहे की, स्थानिक राजकीय नेत्यांनी इमारतीमधील नागरिकांची कोरोनाची चाचणी करण्यात यावी अशी विनंती केली. परंतु याबाबद्दल आम्ही आधीच विचार केला होता. यामध्ये बहुतांश नागरिकांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यामधील काहींना अन्य आजार असल्याचे ही दिसून आले आहे.