‘राष्ट्रीय युवक दिना’च्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा
मुंबई – ‘उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका’, हा जगण्याचा आणि जिंकण्याचा मूलमंत्र स्वामी विवेकानंदानी आपल्याला दिला, तोच मूलमंत्र आजच्या युवकांनी अंगिकारावा, तीच स्वामी विवेकानंदांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करुन ‘राष्ट्रीय युवक दिना’च्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, स्वामी विवेकानंदांनी आपल्या तेजस्वी विचारांनी, ओघवत्या वक्तृत्वाने आणि राष्ट्रप्रेमाच्या ऊर्जेने जगभरातल्या युवकांना कायमच प्रेरणा दिली.
वाचा :-‘शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे उद्योग बंद करा’, खोत यांचा शेट्टींना टोला
जगभरातील युवकांना जगण्याचा आणि जिंकण्याचा मूलमंत्र स्वामी विवेकानंदांनी दिला. आपण दुर्बल आहोत, हा विचार पहिल्यांदा प्रत्येकाने आपल्या मनातून काढून टाकावा. जीवन जगताना कोणतेही एक ध्येय मनाशी बाळगावे, त्याचा आयुष्यभर ध्यास धरावा, तो विचार पूर्ण करण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावावी, ही शिकवण स्वामी विवेकानंदांनी आपल्याला दिली. राष्ट्राला बलशाली बनविण्यासाठी, त्यांच्या शिकवणीनुसार सर्व युवकांनी संघटीतपणे काम करावे, हीच स्वामी विवेकानंदांना खरी आदरांजली ठरेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.