“मी नारायण राणेंचं समर्थन करत नाही, पण….”, चंद्रकांत पाटलांनी मांडलं स्पष्ट मत
पुणे |
मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याच्या नारायण राणेंच्या वक्तव्यामुळे आता राज्यात चांगलीच खळबळ माजली आहे. शिवसैनिक संतापले असून राणेंवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. काही भाजपा नेत्यांनी मात्र नारायण राणे यांची पाठराखण केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही नारायण राणे यांना पाठिंबा देत आपलं मत व्यक्त केलं आहे. याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझाशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, प्रत्येकाची वेगळी शैली असते. नारायण राणेंचीही आहे. मी त्या शैलीचं समर्थन करत नाही. पण त्यासाठी थेट अटक? अटक करणं कितपत योग्य आहे? तेही एका केंद्रीय मंत्र्यांना? सरकारने, प्रशासनाने नारायण राणे यांना समज द्यायला हवी होती. मात्र थेट अटक करणं योग्य नाही. राज्य सरकारकडे केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याचे अधिकार नाहीत.
उद्धव ठाकरेंच्या तसंच शिवसेना नेत्यांच्या शैलीवरही चंद्रकांत पाटलांनी टीका केली आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंची दसरा मेळाव्याची भाषणं काढून पाहा. त्यातही त्यांनी वादग्रस्त विधानं केली आहेत. नीलम गोऱ्हे सभापती असून त्या राजकीय वक्तव्यं करतात. त्यांना विचारा, की तुम्ही सभापतीपदाचा राजीनामा दिला आहे का? राणेंच्या वतीने पक्ष दिलगिरी व्यक्त करणार का या मुद्द्यावर बोलताना पाटील म्हणाले, दिलगिरीचा मुद्दा येत नाही. नारायण राणे हे नारळासारखे आहेत. वरून कठोर असले तरी ते आतून मऊ मनाचे आहेत. त्यांना वाटलं तर ते बोलतील. पण त्यांच्या एका वक्तव्यावरुन थेट अटक? आम्ही काही आडमुठे नाही. आम्हाला तेवढं महत्त्वाचं वाटलं तर विचार करु. पण राणेंच्या अटकेनंतर महाराष्ट्रात त्याचे काय परिणाम होतील याचा विचार सरकारने केला आहे का? राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची आहे. त्याबद्दल त्यांनी विचार केला आहे का?