मावळातील पार्थ नावाच्या वादळाला पूर्णविराम, बारणे यांच्यापुढील एक संकट टळले
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – लोकसभेच्या मावळ मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र, आज पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘पवार कुटुंबियातून केवळ मी लोकसभा निवडणूक लढविणार’ असल्याची प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून मावळ मतदार संघात घोंघावणा-या पार्थ नावाच्या वादळाला अखेर पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार तथा विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यापुढील एक संकट टळल्याचे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.
मावळ मतदार संघातून पार्थ पवार राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेने मावळातील राजकीय क्षेत्राला वेगळेच वळण मिळाले होते. स्वतः अजित पवार यांनीच पार्थ पवार यांच्या संभाव्य उमेदवारीचे संकेत दिले होते. सांगवी येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या परिवर्तन सभेत देखील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पार्थ पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या इच्छुकांना धक्का बसला होता. त्यांच्यामध्ये कमालीची नाराजी पसरली होती. एवढे दिवस केलेली मेहनत पाण्यात गेल्याच्या वेदना पक्षाच्या निष्ठावंत पदाधिका-यांनी व्यक्त केल्या होत्या. परंतु, त्यांच्या नाराजीला शरद पवार यांच्या प्रतिक्रियेने नवचेतना मिळाली आहे.
शरद पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना ‘पवार कुटुंबियांतून केवळ मी लोकसभा निवडणूक लढविणार’ आहे, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने मावळ मतदार संघासाठी पार्थ पवार यांच्या नावाची जी घोषणा झाली होती, ती हवेत विरली आहे. त्यामुळे पार्थ नावाच्या वादळाला आता पूर्णविराम मिळल्याचे मानले जात आहे. मावळातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यापुढील एक संकट टळल्याचे मानले जात आहे. कारण, पार्थ यांच्या नावाने पवार कुटुंबियांच्या प्रतिष्ठेपुढे बारणे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. शरद पवार यांच्या वक्तव्याने बारणे यांना दिलासाच मिळाला असेल. त्याचबरोबर पक्षाचे संभाव्य उमेदवार संजोग वाघेरे यांना देखील हाय से वाटले असल्याचे वाटते.