breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपमध्ये माझी अवस्था वाजपेयी, अडवाणींसारखी झाली असती – एकनाथ खडसे

जळगाव – राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं आज मुक्ताईनगरला आगमन झालं. राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्यानंतर खडसे हे पहिल्यांदाच मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं. यावेळी खडसेंनी पुन्हा एकदा मनातली सल बोलून दाखवली. मी भाजपमध्ये राहिलो असतो, तर माझी अवस्था वाजपेयी आणि अडवाणींसारखी झाली असती, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

एकनाथ खडसे पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्तींनी माझ्यावर अन्याय केला. भाजपामध्ये माझ्यावर खूप अन्याय सुरू होता. भाजपविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. फडणवीस यांनी मला त्रास दिला, ही माझी भावना आहे. भाजपतच राहिलो असतो, तर मी राजकीय विजनवासात गेलो असतो. अडवाणी, अटलजींच्या बाबतीत जे झाले, तेच माझ्या बाबतीत झाले असते. म्हणून मी पक्षांतराचा निर्णय घेतला. शरद पवारांनी मला राष्ट्रवादीत प्रवेश देऊन माझे राजकीय पुनर्वसन केले. मी त्यांचे आभार मानतो, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसे रविवारी दुपारी त्यांच्या मुक्ताईनगर येथील फार्महाऊसवर दाखल झाले. त्याठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. फार्महाऊसवर येण्यापूर्वी खडसे त्यांच्या मूळगावी कोथळी येथे गेले. तेथे भाजप खासदार रक्षा खडसेंनी त्यांचे औक्षण केले. कोथळी येथून फार्महाऊसवर आल्यानंतर खडसेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते पुढे म्हणाले की, दसरा हा आनंदाचा सण आहे.

भाजपत आपल्याला अपमानाची वागणूक मिळाली. तेव्हा कार्यकर्ते चिडायचे, संताप व्यक्त करायचे. गेली चार वर्षे मी हा अन्याय सहन केला. माझे मंत्रिपद का काढले ? हे आजही अनुत्तरित आहे. मला बाजूला सारल्याने मतदारसंघाचा विकास थांबला. विधानसभा निवडणुकीच्या काळात मला तिकीट नाकारून कन्या रोहिणीला तिकीट दिले. मात्र, भाजपच्या काही लोकांनी रोहिणीच्या विरोधात काम करून त्यांना पाडले. याचे पुरावे मी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना दिले होते. तरीही कुणावरही पक्षाकडून कारवाई झाली नाही. रोहिणी खडसेंच्या विरोधात काम करणाऱ्या भाजपच्या लोकांचे फोटो, व्हिडिओ मी दिले होते. या साऱ्या घडामोडींमुळे अनेक कार्यकर्ते नाराज होते, असेही खडसे म्हणाले.

मला तिकीट नाकारले तेव्हा राष्ट्रवादीने माझ्यासाठी एबी फॉर्म आणला होता. तेव्हाच जर का मी राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून उभा राहिलो असतो, तर मी निवडून आलो असतो. पण, मंत्रीही झालो असतो. त्याचदिवशी राष्ट्रवादीकडून उभा राहिलो असतो तर राजकारणाचे चित्र वेगळे राहिले असते. भाजपातील काहींनी रोहिणी आणि माझ्यात भांडण लावले. त्यानंतर सोशल मीडियावर कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पक्षांतर का करत नाही ? म्हणून माझ्यावर कार्यकर्त्यांचा दबाव होता. याच दबावातून मी पक्षांतर केले आहे, असे खडसेंनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button