माफी मागा असे म्हणण्याचा भाजपाला नैतिक अधिकार आहे का ? – सचिन साठे
पिपंरी ! महाईन्यूज ! प्रतिनिधी
देशातील सव्वाशे कोटी जनतेची दिशाभूल करणा-या भाजपाने आपल्या अंतर्मनात डोकून पहावे व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देशाची जाहिर माफी मागावी. अशी मागणी पिंपरी- चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.
शनिवारी (दि. 16 नोव्हेंबर) भाजपाने ठिकठिकाणी ‘राफेल’ विषयावर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी जनतेची माफी मागावी, यासाठी निदर्शने करुन प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न केला. अशी मागणी करण्याचा नैतिक अधिकार भाजपाला आहे का ? हे प्रथम भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या अंतर्मनात डोकून पहावे. कॉंग्रेसने नेहमीच न्याय व्यवस्थेचा आदर केला आहे. देशभरातील जनतेच्या मनातील ‘राफेल’बाबत संभ्रम दूर करण्यासाठी भाजपाने प्रथम काही प्रश्नांची उत्तरे जनतेला दिली पाहिजेत. देशाच्या संरक्षणाशी संबंधित हा विषय असताना भाजप त्याचे राजकीय फायदे उठविण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘राफेल’ बाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरु असताना या विषयाची फाईल केंद्र सरकारच्या संरक्षणात असतानाही गहाळ झाली, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयात सरकार पक्षाने दिली.
याबाबत पंतप्रधानांनी किंवा संरक्षण मंत्र्यांनी जनतेची माफी मागितली का ? या विषयाबाबत चौकशीसाठी संसदेच्या संयुक्त समितीची नेमणूक करावी, अशी मागणी असतानाही सरकारने दुर्लक्ष केले. सरकारची हि भुमिका संशयास्पद आहे. 2014 पुर्वी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारवर टू जीबाबत आणि कोळसा खाणींबाबत भाजपाने बेताल आरोप केले होते. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने देखील टू जी व कोळसा खाणींबाबतचे आरोप फेटाळून सरकार पक्षाच्या बाजूने निकाल दिला होता. त्यावेळी भाजपाने माफी मागितली होती का ? 2014 च्या लोकसभा निवडणूकीत फसवी आश्वासने देऊन जनतेची भाजपाने दिशाभुल केली. पाच वर्षांचा कार्यकाल पुर्ण झाला तरी एकही आश्वासन पुर्ण करु शकले नाही, असा आरोप साठे यांनी केला आहे.
देशातील एकाही नागरिकाच्या बँक खात्यात अद्यापपर्यंत केंद्र सरकारने पंधरा लाख रुपये जमा केले नाहीत. उलट हा ‘चुनावी जुमला’ होता असे म्हणणा-या अमित शहांनी, पंतप्रधान मोदींनी आणि भाजपाच्या पदाधिका-यांनी देशाची माफी मागावी. शेतक-यांना शेतमालाच्या दीडपट हमीभाव अजूनही दिला नाही. याबाबत कधी पंतप्रधान मोदी, अमित शहा किंवा केंद्रिय कृषीमंत्र्यांनी शेतक-यांची माफी मागितली आहे का ? या प्रश्नांची उत्तरे भाजपाने द्यावीत, अशी मागणी साठे यांनी केली आहे.