मातृभाषेत शिक्षण घेतल्याने निर्णय घेण्याची क्षमता वाढते – कवी रामदास फुटाणे
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी
मातृभाषेत शिक्षण घेतल्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता वाढते म्हणून मातृभाषेत शिक्षण घेणे, त्याचा वापर करणे आवश्यक आहे. महानगरपालिकेने मराठी भाषेचा गौरव व्हावा, मराठी भाषा जागी रहावी, तिचे महत्व कमी होऊ नये, याकरिता प्रयत्नशील आहे. त्याबद्दल महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी कौतुकास पात्र आहेत. असे मत ज्येष्ठ कवी वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकरामनगर येथे कवी संमेलनाचे आयोजित करण्यात आले होते त्याचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सहाय्यक आयुक्त संदिप खोत, अण्णा बोदडे, ज्येष्ठ हास्य कवी अशोक नायगांवकर, अरुण म्हात्रे, भरत दौंडकर, अनिल दिक्षित, बंडा जोशी, अरुण पवार, प्रशांत मोरे आदी कवी उपस्थित होते.
यावेळी रामदास फुटाणे म्हणाले, आज जपान, जर्मनी, फ्रान्स सारखे देश आपली मातृभाषा जपल्यामुळेच विकसित राष्ट्र म्हणून जात ओळखली आहेत. मराठी ही भाषा परकीय आक्रमणांनंतरही तलवारीमुळे नाही तर आपल्या साहित्यमुळे टिकून राहिली. मराठी भाषेचा बळी देऊन इंग्रजी भाषा घरात येता कामा नये. मराठी भाषेच्या संवर्धनाची सुरुवात घरापासूनच होणे आवश्यक आहे.
यावेळी सहभागी कवी प्रशांत मोरे यांनी ‘दुःखाच्या भेगा कष्टाने लिंपवाव्या’ हि ग्रामीण भागातील समस्यांवर भाष्य करणारी कविता सादर केली. तसेच शेतक-यांच्या व्यथा आपल्या कवितांमधून मांडल्या. कवी अरुण म्हात्रे यांनी ‘ती वेळ निराळी होती, हि वेळ निराळी आहे’ या कवितेद्वारे बदलत्या जीवनशैलीवर भाष्य केले.
कवी बंडा जोशी यांनी सैराट चित्रपटातील येड लागलंय येड लागलंया गाण्यावर मोबाईलच्या अतिवापरामुळे होणा-या दुष्परिणामावर भाष्य करणारी विडंबनात्मक कविता सादर केली. तसेच राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे विडंबनात्मक काव्य सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कवी अरुण पवार यांनी शेतक-यांचे दुःख व व्यथा मांडणा-या कविता सादर केल्या. तसेच कवी अनिल दीक्षित यांनी पत्र या हास्य कवितेद्वारे वर्तमान परिस्थितीवर भाष्य केले.
ज्येष्ठ हास्य कवी अशोक नायगांवकर यांनी शाकाहार ही हास्य कविता सादर करून प्रेक्षकांना खळखळून हसवले. तसेच आपल्या भ्रमण या कवितेद्वारे सध्याच्या सामाजिक परिस्थितीचे चित्र प्रेक्षकांसमोर उभे केले.