भारत-पाकिस्तान कसोटी सामना लवकरच खेळला जाणार?
तब्बल 15 वर्षानंतर होणार भारत-पाकिस्तान कसोटी सामना
मेलबर्न व व्हिक्टोरियन सरकार भारत व पाकिस्तान कसोटी सामन्याचे आयोजन करणार
मुंबई : भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये गेल्या 15 वर्षांपासून एकही कसोटी सामना खेळला गेलेला नाही. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेतच हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडतात. मात्र, या दोन्ही संघांमध्ये कसोटी सामना आयोजित करण्यासाठी एक देश पुढे आला आहे. यामुळे आता भारत-पाकिस्तान कसोटी सामना प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.
टी-20 वर्ल्ड कपमधील भारत व पाकिस्तान सामन्याला प्रचंड मोठं यश मिळालं. त्यामुळे आता या दोन्ही संघात तटस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळवण्याचा तयारी चालली आहे. मेलबर्न क्रिकेट क्लब व व्हिक्टोरियन सरकारने भारत व पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामन्याचे आयोजन करण्याची तयारी दाखवली असून, याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे अनौपचारिक चौकशी केल्याची माहिती एमसीसीचे मुख्य कार्यकारी स्टुअर्ट फॉक्स यांनी दिली.
मेलबर्न क्रिकेट क्लब आणि व्हिक्टोरियन सरकारने या कसोटीचे आयोजन करण्यासाठी संयुक्तपणे सीएशी संपर्क साधला होता. उल्लेखनीय म्हणजे, २०१३ पासून, भारत आणि पाकिस्तान विश्वचषक आणि आशिया कपमध्येच एकमेकांसमोर येतात. या व्यतिरिक्त द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात एकमेकांसमोर आलेले नाहीत. २००७ पासून दोन्ही संघ एकाही कसोटीत आमनेसामने आलेले नाहीत, असं एमसीसीचे सीईओ स्टुअर्ट फॉक्स म्हणाले. ते ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुस-या कसोटीच्या चौथ्या दिवशी सेन रेडिओवर बोलत होते.
भारत-पाकिस्तानमधील कसोटी सामना ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यास नक्की आवडेल. अर्थात, दोन्ही देशांच्या सहमतीवर ते अवलंबून असेल. याबाबतचा अंतिम निर्णय बीसीसीआय व पीसीबी घेईल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितले.