माजी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेखही चालवून घेतला नसता : जयंत पाटील
मुंबई – अभिनेत्री कंगना रनौत हिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्याने राज्य सरकारमधील मंत्र्यांपासून सर्वसामान्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कोणी त्यांचा एकेरी उल्लेख केला असता, तर तेही चालवून घेतले नसते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
“एखाद्याने प्रसिद्धीसाठी विधानं केली, तर प्रसारमाध्यमांनी दुर्लक्ष करावे, कशाला किती महत्त्व द्यायचे? याला काही मर्यादा आहेत. राज्यातील प्रमुखांबाबत अशी भाषा वापरणे हे जनतेला मान्य आणि सहन होणार नाही” असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांचा कोणी एकेरी उल्लेख केला असता, तर तेही मान्य केलं नसतं, असे जयंत पाटील म्हणाले.
कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईला बीएमसी उत्तर देईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या प्रकरणावरुन नाराज आहेत, हे तुम्ही सांगितल्यावर समजलं. माझ्या माहितीत असं आलेलं नाही, असेही ते म्हणाले.
कंगनाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या बाजूने बोलण्याची अपेक्षा आहे, मात्र भाजप नेते ती पूर्ण करत नाहीत. कोण कुणाला समर्थन देत आहे मुद्दामहून, हे महाराष्ट्राच्या लक्षात येत आहे. कंगनाचा बोलविता आणि करविता धनी कोण आहे, हे दिसत आहे. तिच्या मागे कोणता पक्ष आहे, हे आता स्पष्ट झालं आहे, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.