महत्त्वाची पदे देऊन, सारे त्यांच्या मनासारखे करूनही घात!
आदित्य ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांना टोला
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजारी असताना बंडखोरीबाबत कुणकुण लागली होती. मात्र वर्षांनुवर्षे जे पक्षात होते व पक्षाने त्यांना मोठे केले, सारे निर्णय त्यांच्या मनासारखे घेतले, ते असे करतील असे कधीच वाटले नव्हते. अशांवर अविश्वास दाखविणे किंवा पाळत ठेवणे हे शिवसेनेत कदापिही होत नाही. हे बाळासाहेबांपासून चालते आले व त्यानुसारच शिवसेना पक्षप्रमुख वागले; पण ज्यांनी आत्माच विकला होता त्यांना थांबविण्यात काहीच अर्थ नव्हता, अशी टिप्पणी युवासेनेचे अध्यक्ष व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात बोलताना ठाकरे यांनी शिवसेनेतील फूट, भाजपची खेळी, शिवसेनेची कार्यशैली अशा विविध विषयांवर ऊहापोह केला. शिवसेनेत झालेल्या बंडाविषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख आजारी असताना बंडाची थोडीफार कुणकुण लागली होती. त्यांच्याकडे नंतर विचारणा करण्यात आली असता त्यांनी असा काही विचार नाही, असे स्पष्ट केले होते. शिवसेनेने यांना मोठे केले. सत्ता आल्यावर प्रत्येक मुख्यमंत्री नगरविकास खाते स्वत:कडे ठेवतो, अशी राज्यात परंपराच पडली होती. पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा खंडित करीत एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते सोपविले. त्यांच्यावर पक्षाने पूर्ण विश्वास टाकला. विश्वास टाकला तर १०० टक्के ठेवायचा अन्यथा नाही, हे माझे आजोबा बाळासाहेब नेहमी सांगायचे. यांच्यावर आम्ही सारा विश्वास टाकला होता; पण यांनी घात केला, अशा शब्दांत ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. पण असो, जे घडले ते पचविताना मनाला थोडय़ा वेदना झाल्या; पण बरे झाले घाण गेली! पक्षाने सारे यांच्या मनासारखे केले. मंत्रिपद, विधिमंडळ पक्षनेतेपद, विरोधी पक्षनेतेपद ही सारी पदे यांनाच दिली. यांना अजून काय हवे होते? एवढे पक्षाने देऊनही त्यांनी विश्वासघात करत गद्दारी केली.