चिखलीच्या नियोजित जलशुध्दीकरण जागेतील झाडांची पुर्नतपासणी
महापाैर उषा ढोरे यांनी अधिका-यांना केल्या सुचना, सत्तारुढ पक्षनेते, स्थायी सभापतींची पाहणी
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
‘चिखली येथील नियोजित जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या (डब्ल्यूटीपी) जागेतील झाडांची पुर्नतपासणी आणि मोजणी करुन त्यातील काही झाडे वाचविण्याचा प्रयत्न करावा. जी झाडे काढण्याची आवश्यकता आहे तेवढीच काढावीत व प्रकल्पाचे काम त्वरीत सुरु करावे”, अशा सूचना महापौर उषा ढोरे यांनी केल्या.
चिखली येथील 100 एमएलडीचा नियोजित जलशुद्धीकरण प्रकल्प वेळेत मार्गी लागण्याच्यादृष्टीने, महापौर ढोरे, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी-ठेकेदार यांच्यासमवेत केंद्राच्या जागेची पाहणी केली. त्यावेळी, ढोरे यांनी वरील सूचना केल्या. सहशहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत आदी यावेळी उपस्थित होते.
या प्रकल्पाच्या ठिकाणी अंदाजे 1527 झाडे आहेत. ही झाडे काढण्यास वृक्ष प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. डब्ल्यूटीपी बांधण्याच्या कामाची मुदत 24 महिने आहे. मात्र, पाणी पुरवठा विभागाने हे काम 12 ते 14 महिन्यांतच पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. या कामासाठी बुधवार (ता.4), गुरुवार, शुक्रवार या तीन दिवसांत डब्ल्यूटीपीच्या प्रत्यक्ष खोदाईच्या जागेतील वृक्ष काढून त्याची अन्य ठिकाणी पुर्नरोपण करणे व जी झाडे पुर्नरोपण करणे शक्य नाहीत. ती काढून टाकण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्याचेही निर्देश ढोरे यांनी दिले.
या तीन दिवसांतील कामाची पाहणी करण्यासाठी सर्व पदाधिकारी पुन्हा त्या ठिकाणी जाणार आहेत. शनिवारपासून त्या ठिकाणी काम चालू करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने आवश्यक ती यंत्रणा आणावी, अशाही पदाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. शहरासाठी आंद्रा आणि भामा-आसखेड धरणामधून पाणी उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भामा धरणामधून 167 एमएलडी तर आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी उचलण्याची परवानगी पालिकेला मिळाली आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात चिखली येथे हा डब्ल्यूटीपी बांधण्यात येणार आहे.