‘महापौर निधी’च्या नावाखाली भाजप पदाधिका-यांचा पालिकेच्या तिजोरीवर ‘डोळा’
- पुढील अर्थसंकल्पात महापौर निधी 5 कोटींवरुन 8 कोटी होणार
- महापौर राहूल जाधव यांची लेखा विभागाला विशेष शिफारस
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना झाल्यानंतर शहराच्या महापौरांना विशेष निधी असावा म्हणून तत्कालीन दुरदृष्टीच्या सत्ताधा-यांनी वर्षीक अर्थसंकल्पात महापौर निधीसाठी 3 कोटींची तरतूद केली. मात्र, भाजपच्या पदाधिका-यांनी या निधीत प्रत्येक वर्षी वाढ करण्याची अक्कल हुशारी चालवली आहे. आगामी अर्थसंकल्पात महापौर निधीत 3 कोटींची वाढ करण्याची शिफारस महापौर राहूल जाधव यांनी केली आहे. माजी महापौर नितीन काळजे यांच्या कार्यकाळात या निधीमध्ये 2 कोटींची वाढ झालेली असताना पुन्हा त्यात तीन कोटींची वाढ सुचविल्याने आश्चर्य वाटल्यास त्याचे नवल ते काय?. ही शिफारस लागू झाल्यास पुढील वर्षात महापौर निधी 5 कोटींवरून 8 कोटी होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना झाल्यानंतर प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेतील पदाधिका-यांनी दुरदृष्टी ठेवून महापौरांना विशेष असा निधी असावा म्हणून पालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पात 3 कोटी निधीची तरतूद ठेवली. त्यानंतर गेल्या पंधरा वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक महापौर होऊन गेले. त्यांनी 3 कोटी निधींवरच शहरातील नागरिकांची कामे केली. मात्र, दीर्घ काळापासून चालत आलेल्या या परंपरेला छेद देण्याचे काम भाजपच्या पदाधिका-यांनी सुरू केले आहे. पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पहिले महापौर होण्याचा मान भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या समुहातले नितीन काळजे यांना मिळाला. 2017-18 च्या अर्थसंकल्पात महापौर निधीत 3 कोटींची वाढ करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार महापौर निधी 3 कोटींवरून 5 कोटी झाला. मागच्या वर्षी यात वाढ केलेली असताना आता पुन्हा महापौर राहूल जाधव यांनी 2018-19 च्या अर्थसंकल्पात 3 कोटींची वाढ करण्याची शिफारस पालिकेच्या लेखा विभागाला सुचविली आहे. त्यांची शिफारस लागू झाल्यास महापौर निधी 5 कोटींवरून 8 कोटी एवढा होणार आहे.
पुढील वर्षात महापौर निधीत 8 कोटींची वाढ होत असली तरी तो निधी महापौरांच्या प्रभागामध्ये खर्च केला जाणार आहे. हा वाढीव निधी खर्ची पडण्यासाठी पालिकेच्या प्रशासनातील अधिका-यांकडून कामे काढली जातील. हा निधी रितसर मार्गाने खर्च केला जाईल. त्यातून लोकांची कामे होतील. म्हणून महापौर निधीत वाढ करण्याची शिफारस केली असल्याची पुष्टी महापौर राहूल जाधव यांनी दिली. मात्र, प्रत्येक महापौर हा प्रत्येक वर्षाच्या अर्थसंकल्पातील महापौर निधीत अशा प्रकारे वाढ करत असेल तर त्याचा अर्थभार पालिकेच्या तिजोरीवर येऊन एका स्वतंत्र प्रभागाचे बजेट एकट्या महापौरांच्या प्रभागामध्ये खर्च करायचे का, असा सवाल निर्माण होणार आहे.