ममतांच्या मदतीला काँग्रेस
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या राजकारणात काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधून विस्तवही जात नाही. एवढे उभयतांमध्ये वितुष्ट. पण त्यांच्यामध्ये हिंसक संघर्ष सुरू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने ममता यांना पाठिंबा दर्शवून त्यांची बाजू उचलून धरली आहे.
काँग्रेसने उघडपणे ममता यांची बाजू घेतली. दोन दिवसांपूर्वी कोलकातामध्ये झालेला हिंसाचार हा भाजपने घडवून आणला आहे. त्याची चित्रफीतही प्रसिद्ध झाली आहे. यामुळे हिंसाचाराबद्दल तृणमूल काँग्रेसला कसा दोष देणार, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रणदिपसिंग सुरजेवाला यांनी केला. विद्यासागर यांच्या पुतळ्याची कोणी मोडतोड केली, हे साऱ्यांनी बघितले आहे. यावरून हिंसाचारात कोणाचा पुढाकार होता हे स्पष्टच आहे, असेही सुरजेवाला म्हणाले.
निवडणुकीत आदर्श आचारसंहिता असते. पण सध्या चुकीचे वागण्याची मोदी आचारसंहिता अस्तित्वात आल्याची टीकाही सुरजेवाला यांनी केली. मोदी आणि शहा यांच्या विरोधात काँग्रेसने आचारसंहिता भंगाच्या ११ तक्रारी निवडणूक आयोगाकडे सादर केल्या होत्या. पण निवडणूक आयोगाने त्यांना केराची टोपली दाखविली. याउलट विरोधी नेत्यांच्या विरोधातील तक्रारींची आयोगाने तत्परतेने दखल घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.
पश्चिम बंगालमधील काँग्रेसच्या काही नेत्यांचा ममता बॅनर्जी यांना तीव्र विरोध असतो. तरीही काँग्रेसने निवडणूक निकालानंतर ममतादिदींची मदत लागू शकते हे गृहीत धरून मदत केल्याचे मानले जाते.